rain update – विदर्भात बुधवारी सायंकाळपासून सुरू झालेली कोसळधार गुरुवारी रात्री उशिरापर्यंत कायम राहिल्याने बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात नदी, नाल्यांना पूर आला. मेहकर व लोणार तालुक्यांमध्ये सर्वाधिक हाहाकार उडाला आहे. कांचनगंगा नदीला पूर आल्याने मुंबई-नागपूर महामार्ग बंद पडला. वाशीम जिल्ह्यात कुकसा फाट्याजवळील नदीला पूर आल्याने जुना संभाजीनगर-नागपूर, किनिराजा-वाशीम आणि मेडशी-भैरद मार्गावरील वाहतूक थांबली होती. यवतमाळातील घाटंजी-येरंडगाव आणि वर्धा-राळेगाव मार्गही पुरामुळे बंद करण्यात आला होता. वाघाडी नदीला पूर आल्याने घाटंजीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उघड्यावर आले. शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट मात्र टळले आहे. बुलढाण्यासह मेहकर, चिखली तालुक्यांतील २३ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव भागात सलग १९ तासांपासून पाऊस पडत होता. डोणगावमधील अंधारवाडी भागात पाचशेवर नागरिकांना हलविण्यात आले. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरून घरांतील साहित्याचे नुकसान झाले. मेहकरजवळ समृद्धी महामार्गावरील इंटरचेंजवरूनदेखील नदीच्या पात्रासारखे पाणी वाहू लागले. महामार्गाच्या पुलाखालूनही पाणी वाहू लागल्याने मेहकर-खामगाव महामार्ग ठप्प झाला होता. डोणगाव येथील काही शेतकरी पुरात अडकले. झाडावर चढून त्यांनी आपला जीव वाचविला. एनडीआरएफच्या पथकाने या सर्वांना सुखरूप बाहेर काढले. मुंबई-नागपूर महामार्गावरील वाहतूक कांचनगंगा नदीच्या पुराने ठप्प. नदीपासून पाचशे मीटर अंतरापर्यंत पुराचे पाणी. पूर ओसरण्याची वाट पाहणारे कारमधील लोक वाहनातच बसून होते. मात्र, रस्त्यावर पाणी वाढल्याने कार तेथेच सोडून लोक जीव वाचवून पळाले. वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील डिगडोह येथे यशोदा नदीला पूर. वर्धा-राळेगाव मार्ग बंद. आलमडोह गावात पुराचे पाणी शिरले.