Rahul Gandhi : सरकार 2025 वर्षाविषयी बोलण्याचे टाळून 2047 या वर्षासाठीची स्वप्नं विकत आहे; राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली : मोदी सरकारचा ११ वर्षांचा कार्यकाळ म्हणजे ना उत्तरदायित्व, ना बदल; केवळ प्रचार. सरकार २०२५ वर्षाविषयी बोलण्याचे टाळून २०४७ यावर्षासाठीची स्वप्नं विकत आहे, असे टीकास्त्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोडले. मोदी सरकार ११ वर्षांची सेवा साजरी करत असताना देशातील वास्तव मुंबईजवळून आलेल्या दुर्दैवी बातमीतून दिसते.
रेल्वे दुर्घटनेत काही जण मृत्युमुखी पडले. भारतीय रेल्वे कोट्यवधी जनतेच्या दृष्टीने महत्वाचा आधारस्तंभ आहे. मात्र, आज रेल्वे असुरक्षा, गर्दी आणि अव्यवस्थेची प्रतीक बनली आहे. देशाला आज कशाला सामोरे जावे लागतेय; ते कोण पाहणार, असा सवाल राहुल यांनी सोशल मीडियावरून केला. रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटूंबीयांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केली.
कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात लोकशाही, अर्थव्यवस्था आणि सामाजिक सलोख्याला मोठा हादरा बसला. मागील यूपीए सरकारच्या कार्यकाळात देशाचा विकास दर सरासरी ८ टक्के इतका असायचा. आता तो ५ ते ६ टक्क्यांच्या आसपास असतो. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या पुरवण्याचे आश्वासन देण्यात आले.
प्रत्यक्षात तरूणांच्या कोट्यवधी नोकऱ्या हिरावण्यात आल्या. महागाईमुळे जनतेची बचत ५० वर्षांत नीचांकी पातळीवर आली आहे. तर, आर्थिक विषमता १०० वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहचली आहे, असा दावा त्यांनी केला. नोटबंदी, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी, नियोजन नसलेले लॉकडाऊन आदींमुळे कोट्यवधी नागरिकांचे भविष्य उद्धवस्त झाले, असा आरोपही खर्गे यांनी केला.





