Rahul Gandhi : विरोधी पक्ष लवकरच हायड्रोजन बॉम्ब उघड करणार; राहुल गांधीनी दिला इशारा

पाटणा : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी बिहारमधील त्यांच्या मतदार अधिकार यात्रेच्या मोठ्या सभेचा समारोप करताना भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला. विरोधकांनी आतापर्यंत अणुबॉम्ब पुरावे सादर केले होते. आता त्याहूनही मोठा हायड्रोजन बॉम्ब उघड करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. भाजप आणि निवडणूक आयोग मिळून बिहार निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून नावे वगळत आहेत या विरोधकांच्या आरोपाचा राहुल यांच्या या विधानाला सदर्भ होता.
विरोधकांचा दावा आहे की निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरावृत्ती प्रक्रियेद्वारे ६५ लाखांहून अधिक मतदारांना वगळण्याची तयारी सुरू आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. पाटणा येथील मतदार हक्क रॅली दरम्यान राहुल गांधी म्हणाले, आम्ही भाजपला संविधानाची हत्या करू देणार नाही. म्हणूनच आम्ही ही यात्रा काढली आहे आणि जनतेने आम्हाला प्रचंड पाठिंबा दिला आहे.
ते म्हणाले की बिहारच्या लोकांनी महाआघाडीला पाठिंबा दिला आणि मत चोर, गादी सोड हा नारा दिला असून हा नारा आता चीनपर्यंत घुमत आहे. पंतप्रधान मोदी सध्या एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला गेले असल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी हा दावा केला. दरम्यान, भाजपने राहुल यांच्या आरोपांवर पलटवार केला आहे आणि त्यांचे विधान बेजबाबदारपणाचे असल्याचे म्हटले आहे.
माजी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, राहुल गांधींचे शब्द समजून घेण्यासाठी वेळ लागतो. निवडणुकीत अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्बचा अर्थ काय? राहुल यांच्या पाटणा येथील रॅलीत गर्दी दाखवण्यासाठी २० हजार लोकांना उत्तर प्रदेशातील देवरिया येथून आणण्यात आल्याचा आरोपही भाजप नेत्यांनी केला.





