नवी दिल्ली – घटनात्मक पदांवर काम करणाऱ्यांचा सतत अवमान करून आणि विविध विषयावर दिशाभुल करणारी माहिती सादर करून राहुल गांधी हे देशासाठी घातक बनत चालले आहेत अशी टीका अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी राहुल गांधी यांना उद्देशून डूमस्डे मॅन असा शब्द प्रयोग वापरला आहे.
लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी ही टीका केली. त्या म्हणाल्या की, कॉंग्रेसचे माजी प्रमुख विविध विषयांवर खोटी माहिती व समज पसरवत आहेत. पण त्यांनी केलेल्या आरोपांवर सरकारकडून दिली जाणारी उत्तरेही ऐकण्याची क्षमता त्यांच्यात नाही. आपल्याला कॉंग्रेस नेत्यांच्या या दोन धारणा लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यांचा लोकशाहीनियुक्त सरकारवरील विश्वास पुर्णत: नाहींसा झाला आहे असेही त्या म्हणाल्या.
त्यांनी राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणाचा संदर्भ देऊन सांगितले की आपण अर्थसंकल्पावरील भाषणाचा पाया तयार करीत आहोत असे सांगत राहुल गांधी यांनी कृषी कायद्यांवरच मते व्यक्त केली.पण अर्थसंकल्पावर ते एक शब्दही बोलले नाहीत. अर्थसंकल्पातील किमान दहा मुद्द्यावर ते बोलतील अशी आपली अपेक्षा होती पण त्यातही त्यांनी निराशा केली असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.
कॉंग्रेसने कृषी कायद्यांवर यु टर्न का घेतला असा प्रश्न आम्ही केला पण त्यावर त्यांचे उत्तर आले नाही. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मध्ये त्यांनी कर्ज माफीची घोषणा केली होती पण ती त्यांनी का केली नाही असा सवालही त्यांनी केला. पंजाबातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते बोलले नाहीत.
कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात कसे आहेत याचा एकही मुद्दा त्यांनी उपस्थित केला नाही. कॉंग्रेसला फक्त हम दो हमारे दो याचीच चिंता आहे. त्यांच्या जावयाने शेतकऱ्यांच्या ज्या जमीनी घेतल्या त्या परत कधी केल्या जातील असा सवालही त्यांनी केला.
त्या म्हणाल्या की मनमोहनसिंग यांनी मार्केट कमिट्यांमध्ये सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली होती त्यावर राहुल गांधी का बोलले नाहींत असा सवालही त्यांनी केला. देशाचे विभाजन करणाऱ्या शक्तींशी कॉंग्रेसने हातमिळवणी केली आहे असा आरोपहीं त्यांनी केला.