Prithviraj Chavan : …तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो; पृथ्वीराज चव्हाण यांचे गोपीनाथ मुंडेबाबत मोठं वक्तव्य
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पत्रकार परिषद घेत दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासंदर्भातील विधानाबाबत अधिक स्पष्टपणे भूमिका मांडली.

Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडे आमच्यासोबत असते तर 2014 ची निवडणूक हारलो नसतो. राज्यात आमची पुन्हा सत्ता आली असती तर गोपीनाथ मुंडे यांचे नाव सुचवले असते, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पत्रकार परिषद घेत दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासंदर्भातील विधानाबाबत अधिक स्पष्टपणे भूमिका मांडली. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासंदर्भात बोलताना दुसरा शब्द गेला, त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त केली असल्याचे त्यांनी म्हटले.
चव्हाण म्हणाले, कराडला पत्रकार परिषदेत विजय वड्डेटीवर यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. मंत्री पंकजा मुंडे यांना काँग्रेसमध्ये येण्याबाबत ते बोलले होते. त्यावर मी गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतची आठवण सांगितली होती. त्यावेळी सगळे काही व्यवस्थित झाले असते आणि ते आमच्या सोबत आले असते तर 2014 ला आम्ही निवडणूक हारलो नसतो.
त्यावेळी आम्ही निवडून आलो असतो तर राष्ट्रवादीने मला मुख्यमंत्री होऊ दिले नसते. पण मी त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी गोपीनाथ मुंडे यांच नाव सुचवले असते. गोपीनाथ मुंडे यांचा मी अजिबात अवमान केलेला नाही. माझ्या त्यांच्या बाबतच्या भावना व्यक्त केल्या होत्या. गोपीनाथ मुंडे यांचा इतिहास लिहिला गेला पाहिजे, तो युवकांना समजला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
कराड दक्षिणमध्ये 58 हजार नावे दुबार
कराडला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये एसआयआरची मोहीम चाललेली आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाल्यास 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा दारूण पराभव झाल्यानंतर पाचच महिन्यामध्ये विधानसभेमध्ये एवढा मोठा फेरफार कसा झाला, याचे उदाहरण मी आपल्यासमोर मांडणार आहे.
माझ्या मतदार संघामध्ये जेव्हा संगणकांनी माझ्या 2024 च्या एकूण मतदार याद्यांची माहिती घेतली. त्यावेळेला माझ्या तीन लाख पंधरा हजार मतदानापैकी एकूण 58 हजार नावे दुबार होती. यापैकी 27 हजार नावे माझ्या मतदारसंघामध्येच दुबार होती, असे चव्हाण यांनी म्हटले.






