Rahul Gandhi : दिल्लीतील उत्तम नगर भागात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जनतेला शांतता राखण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. “उत्तम नगरमधील जनतेने हिंसाचाराची मोठी किंमत मोजली आहे, आता त्यांना अधिक रक्तपात नको आहे,” अशा शब्दांत गांधी (Rahul Gandhi) यांनी आपली भूमिका मांडली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षावर थेट निशाणा साधला, भाजप आणि त्यांची यंत्रणा समाजात द्वेष पसरवून हिंसाचार भडकवण्याची एकही संधी सोडत नसल्याचा आरोप केला. Rahul Gandhi होळीच्या उत्सवात रंग उडवल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात तरुण नावाच्या २६ वर्षीय तरुणाचा बळी गेला. या घटनेचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, एका बाजूला एका कुटुंबाने आपला तरुण मुलगा गमावला आहे, तर दुसरीकडे संपूर्ण कुटुंब छळाचा सामना करत आहे. ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी असून देशाची ताकद ही एकता आणि बंधुभावातच आहे. भाजपकडून जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. देशातील महत्त्वाचे मुद्दे आणि धोरणात्मक निर्णय यांपासून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठीच अशा प्रकारे दंगलीसारखी परिस्थिती निर्माण केली जात असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे संरक्षण, ऊर्जा आणि अन्नसुरक्षा यांसारखी महत्त्वाची क्षेत्रे परकीय शक्तींच्या हाती सोपवत असून, त्यावर जनतेने प्रश्न विचारू नयेत म्हणूनच हे धार्मिक राजकारण खेळले जात असल्याचे त्यांनी (Rahul Gandhi) आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.