Purandar Toll Protest : पुरंदरवासीयांचा टोलविरोधात एल्गार! बेलसर टोलनाक्यावर सोमवारी सर्वपक्षीय आंदोलन
Purandar Toll Protest : सोमवार ८ जून रोजी सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांचा बेलसर टोलनाक्यावर धडक मोर्चा.

Purandar Toll Protest – आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील तक्रारवाडी फाट्यानजिक असलेल्या बेलसर टोलनाका येथे सोमवारी (दि. ८ जुन) सकाळी अकरा वाजता सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. बेलसर टोलनाक्यावर २० किलोमीटर परिसरातील स्थानिक भूमिपुत्र शेतकरी, कामगार, व्यावसायिक यांच्या वाहनांना पूर्णतः टोलमाफी मिळावी,
मासिक पास घेण्याची सक्ती करू नये, टोलनाक्याच्या वीस किलोमीटर परिसरातील नागरिकांचे आधारकार्ड पाहून त्यांची वाहने सोडण्यात यावीत, टोल नाक्यावर व्यवस्थापन गतिमान करावे, वाहन चालकांसाठी नियामक दर्जेदार सोयी सुविधा कराव्यात आदी मागण्यांसाठी हे आंदोलन असणार आहे. या अनुषंगाने जेजुरी पोलीस स्टेशन, टोल नाका व्यवस्थापन कंपनी, तसेच तहसीलदार कार्यालय यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जेजुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष संदीप जगताप, माजी विश्वस्त शिवराज झगडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रमेश लेंडे, मनसे तालुकाध्यक्ष उमेश जगताप, शहराध्यक्ष गणेश कुंभार, जिसा संघटनेचे अध्यक्ष विकास पवार, दादा फाऊंडेशनचे यशवंत दोडके, आरपीआयचे गौतम भालेराव, नगरसेवक योगेश जगताप, कृष्णा कुदळे, स्वप्नील हरपळे, देवेंद्र दोडके, विजय झगडे, विक्रम फाळके यांसह विविध संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्यासह टोलनाका व्यवस्थापनातील अधिकारी यांच्याशी चर्चा करत टोलमाफी मिळण्याबाबत भूमिका स्पष्ट केली.
स्थानिकांना टोलमाफी हा त्यांचा हक्क – नगराध्यक्ष बारभाई
स्थानिक भूमिपुत्रांनी रस्ते रुंदीकरण व विकासासाठी आपल्या व्यवसायांच्या जागा, बागायती जमिनी, तसेच राहती घरेदारे, इमारती पाडून जागा दिल्या आहेत. विकासकामांसाठी योगदान देऊनही टोलधाड भूमीपुत्रावर कशासाठी? असा सवाल करत न्यायिक व संविधानिक स्वरूपाच्या आंदोलनात सहभागी असल्याचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी स्पष्ट केले.






