Pune Water Cut: पुणेकरांनो लक्ष द्या! ‘या’ तारखेपासून पुन्हा पाणीकपात सुरू; महापालिका आयुक्तांचा निर्णय
Pune Water Cut: आठवडाभराच्या पावसाने धरणांमध्ये फक्त १७ टीएमसी साठा; पाणी टंचाई टाळण्यासाठी पुन्हा एक दिवस आड पाणीपुरवठा.

Pune Water Cut – पुण्यात मुक्कामी येणाऱ्या संतांच्या पालख्यांमुळे शहरातील पाणीकपात सात जुलैपासूनच तात्पुरती रद्द करण्यात आली होती. मात्र, आता १५ जुलैपासून ती पुन्हा सुरू करण्यात येणार असून, एक दिवस आड पाणी देण्याला पुन्हा सुरुवात केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी सात जुलै रोजी देहूहून तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी ८ जुलै रोजी आळंदीहून पंढरपूरला प्रस्थान ठेवणार होती.
परंतु, त्या आधी सतत आठवडाभर पडलेल्या पावसाने आळंदीमध्ये इंद्रायणी नदीमुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव वारकऱ्यांनी आणि दिंड्यांनी आळंदीत जाऊ नये. पालखी सोहळ्यात पुण्याहून सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आणि जिल्हा तथा स्थानिक प्रशासनाने केले होते. त्यामुळे ७ जुलैलाच अनेक दिंड्या पुण्यात दाखल झाल्या होत्या. १५ जूनपासून शहरात पाणीकपात लागू केली असून,
एक दिवसा आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने जाहीर केला होता. त्यावेळी वारी मुक्काम काळात म्हणजे ८ ते १२ जुलै दरम्यान दररोज पाणीपुरवठा करण्यात येईल, असे महापौरांनी जाहीरही केले होते. परंतु, उपरोक्त स्थिती निर्माण झाल्याने महापालिकेने ७ जुलैपासूनच कपात रद्द केली होती. आठवडाभर पडलेल्या पावसाने सुमारे १७ टीएमसीच पाणी जमा झाले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पाऊसही थांबला आहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा कपात करण्याचा निर्णय घेतला असून, येत्या १५ जुलैपासून पुन्हा एकदा एक दिवस आड पाण्याचे नियोजन सुरू केले जाणार आहे. धरणे शंभर टक्के भरल्यानंतर कपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे राम यांने स्पष्ट केले.





