Pune Water Cut : पुणेकरांवर दिवसआड पाणीपुरवठ्याचे संकट? पाणीप्रश्नी आज महापौरांच्या उपस्थितीत तातडीची बैठक
Pune Water Cut : मान्सून लांबल्याने आणि खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचल्याने पुणे महापालिकेकडून आज तातडीची बैठक आयोजित.

Pune Water Cut – मान्सूनचे शहरातील आगमन लांबल्याने आणि खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचल्याने पुणेकरांवर दिवसआड पाणीपुरवठ्याचे संकट कायम आहे. संभाव्य पाणी संकटाच्या पार्श्वभूमीवर उद्या, सोमवारी (दि. ८ ) महापौरांच्या अध्यक्षतेखाली महापालिका प्रशासनाने तातडीची बैठक आयोजित केली आहे. शहर परिसराला दिवसाआड पाणीपुरवठा लागू करण्याच्या पाणीपुरवठा विभागाच्या प्रस्तावावर या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
एल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी राहणार असून त्यातचे मान्सूनचे आगमन लांबले आहे. यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळीत पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट राहणार आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, खडकवासला धरण साखळीची एकूण क्षमता २९.१५ टीएमसी आहे. सध्या धरणांमध्ये केवळ ५.८७५ टीएमसी (मंजूर कोट्याच्या तुलनेत केवळ २०.१५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.
शहराला दररोज सुमारे १,५०० एमएलडी (दशलक्ष लिटर) पाण्याची आवश्यकता भासते. हा उपलब्ध साठा ३१ जुलैपर्यंत म्हणजेच मान्सून स्थिरावत नाही, तोपर्यंत पुरवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यातच मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणीपुरवठा विभागाने आधीच पाणी कपातीचे नियोजन केले आहे.
सर्व अधीक्षक अभियंत्यांना त्यांच्या भागातील पाण्याच्या कपातीचे नियोजन तयार करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाने आधीच दिले असून, त्यानुसार शहरात क्षेत्रनिहाय रोटेशन पद्धतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव मुख्य अभियंत्यांनी तयार केला आहे. दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवायचा की, एक दिवसाआड करायचा याविषयी मागील दोन महिन्यांपूर्वी चर्चा झाली होती.
या दोन्ही पर्यायांमध्ये किती टक्के पाणी बचत होऊ शकते, यावरही ऊहापोह करण्यात आला होता. एक दिवसाआड पाणी बंद ठेवल्यास २५ टक्के पाण्याची बचत होऊ शकते, असा महापालिका प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे या नियोजनाचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांमार्फत महापालिका प्रशासनाकडे मंजुरीसाठी ठेवला होता. त्यावर आता उद्याच्या महापौरांच्या बैठकीत निर्णय होईल.






