Pune Traffic Police – राज्यातील रस्ते वाहतूक पोलिसांच्या वर्तणुकीबाबत आणि दंड वसुलीच्या पद्धतीबाबत अनेक तक्रारी समोर येत असतानाच, वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी संपूर्ण राज्यभरातील ट्रॅफिक पोलिसांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यापुढे वाहनचालकांना अडवल्यानंतर त्यांच्याशी अत्यंत सौजन्याने आणि आदराने वागण्याचे आदेश देण्यात आले असून, दंड वसुलीसाठी कोणतीही अनावश्यक सक्ती करू नये, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध करण्यात येणाऱ्या कारवाईनंतर अनेक वाहनचालकांनी दंडाची रक्कम भरली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे थकीत वसुली करण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी २६ फेब्रुवारी विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील वाहनचालकांकडून तब्बल ४०० कोटी दंड बाकी आहे. त्यामुळे या मोहिमेचे काय होणार, हा प्रश्न पडला आहे. अप्पर पोलीस महासंचालकांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे, की वाहतूक पोलिसांचे मुख्य काम हे रस्ते सुरक्षा आणि वाहतूक सुरळीत करणे आहे; केवळ दंड वसुली करणे नव्हे. अनेकदा पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांशी अरेरावी केली जाते किंवा वसुलीसाठी दबाव टाकला जातो. ज्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होतो. हे टाळण्यासाठी प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने कर्तव्यावर असताना संयम पाळावा. वाहनचालकांना वाद घालून अपमानास्पद वागणूक देऊ नये, असेही निर्देश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास कायद्यानुसार दंड आकारा. मात्र, कारवाई करताना शिस्त आणि सौजन्य राखणे आवश्यक असल्याचेही नमूद केले आहे. प्रलंबित दंड वसुली मोहिमेदरम्यान वाहनचालकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणेकरांनी भरला सहा कोटी दंड बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध करण्यात येणाऱ्या कारवाईनंतर अनेक वाहनचालक दंडाची रक्कम भरत नसल्याचे समोर आले आहे. एकट्या पुणे शहरात तब्बल ४०० कोटीचा दंड थकीत आहे. त्यामुळे थकीत दंडाची वसुली करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. वाहनचालकांनी येत्या ३० दिवसांत थकीत दंड न भरल्यास वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मोहिम २६ फेब्रुवारी रोजी सुरू झाली. त्यानंतर अवघ्या १४ दिवसांत पुणेकरांनी सहा कोटी रुपये दंड भरला आहे. ई चलनाच्या सर्वाधिक नोटिसा शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर लक्ष ठेवले जात असून, मार्च २०१९ पासून ई-चलन प्रणालीद्वारे दंडाच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत. मात्र, अनेक वाहनचालकांनी या नोटिसांकडे दुर्लक्ष केल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. “अपर पोलीस महासंचालकांच्या आदेशचे पालन केले जाईल. मात्र, शासन पेडिंग दंडाबाबत गंभीर आहे. शासनाकडून दंडाबाबत नव्याने येणाऱ्या आदेशाची वाट बघितली जात आहे.” – मनोज पाटील,अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग