Pune: खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक तसेच विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल होते. अध्यक्षीय भाषणात गोयल म्हणाले, “पारितोषिक वितरण हा केवळ पुरस्कारांचा कार्यक्रम नसून तो संस्थेच्या गुणवत्तेचा उत्सव आहे. कला, कर्तृत्व आणि गुणवत्ता यांचा संगम जिथे घडतो, तिथेच शिक्षणाचा खरा जल्लोष अनुभवायला मिळतो.” त्यांनी विद्यार्थ्यांनी सातत्य, शिस्त आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा स्वीकार करावा, असे आवाहन केले. संस्थेचे ध्येय केवळ पदवी प्रदान करणे नसून जबाबदार व संवेदनशील नागरिक घडविणे आहे, असेही त्यांनी नमूद केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी प्रस्ताविक करत महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला. “टी. जे. महाविद्यालयाने शैक्षणिक उत्कृष्टतेसोबतच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही आपली ठळक छाप निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक यशामागे प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे संस्कार असतात,” असे ते म्हणाले. महाविद्यालयात विविध विभागांच्या माध्यमातून अनेक उपक्रम, कार्यशाळा आणि कौशल्यविकास कार्यक्रम राबविले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. वार्षिक वितरण समारंभासाठी प्रमुख वक्ते प्रदीप निफाडकर यांनी आपल्या प्रभावी शैलीत गझल सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. “गुण हे केवळ गुणपत्रिकेतील आकडे नसतात; ते व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतले प्रकाशकण असतात,” असे सांगत त्यांनी शिक्षणातील संवेदनशीलता आणि जीवनमूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. कला आणि साहित्याचा सहवास व्यक्तिमत्त्व समृद्ध करतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रसंगी संस्थेचे सचिव आनंद छाजेड, पतसंस्थेचे पदाधिकारी रमेश अवस्ते, ॲड. अजित सूर्यवंशी तसेच ज्ञानेश्वर मुरकुटे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास उपप्रचार्य प्रा. महादेव रोकडे, डॉ. सुचेता दळवी, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विध्यार्थी उपस्थित होते. समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले.प्राध्यापकांना पुस्तक, संशोधन लेखन व इतर गुणवत्तापुर्ण कार्य केल्याबद्द्दल त्यांचाही सन्मान सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्वामीराज भिसे आणि डॉ. शीतल रणधीर यांनी केले, तर आभार प्रदर्शन आयक्यूएसी समन्वयक प्रा. गौरी माटेकर यांनी मानले.विद्यार्थ्यांच्या यशाचा उत्सव साजरा करताना कला, कर्तृत्व आणि गुणवत्तेचा संगम अनुभवायला मिळाल्याने हा सोहळा अतिशय संस्मरणीय ठरला, ही भावना विद्यार्थ्यांनी शिक्षकांमध्ये दिसून आली.