येरवडा, दि. 1 (प्रतिनिधी) -एसटी महामंडळाची मान उंचावणाऱ्या शिवशाही बसचे शुक्लकाष्ठ काही केल्या अद्याप संपण्याचे नाव घेईना. अपघातांमुळे कायम चर्चेत असलेल्या या बसला मंगळवारी भर रस्त्यात आग लागली. येरवडा परिसरात घडलेल्या या घटनेत 42 प्रवासी सुखरूप बचावले; पण संपूर्ण बस जळून खाक झाली.
येरवडा येथील शास्त्री चौकात ही घटना घडली. यवतमाळहून चिंचवडकडे ही बस जात होती. बसमधील बिघाडाचा अंदाज आल्याने चालकाने खराडी चौकात प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर तो बस घेऊन चिंचवडकडे निघाला. दरम्यान, शास्त्री चौकात पोहोचल्यानंतर बसने पेट घेतला.
चालकाने वेळीच बस रस्त्याच्या कडेला घेतली. काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतला. ही आग एवढी भीषण होती की, बस जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन बंब व एका टॅंकरच्या मदतीने आग विझवली. या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
गेले काही महिने सतत होणाऱ्या अपघातांमुळे शिवशाही बस चर्चेत आहे. आता आगीच्या घटनेमुळे चर्चेत भर पडली असून, बसच्या आगीचा व्हिडीओ आज दिवसभर प्रसारमाध्यमांवर फिरत होता. प्रवाशांना अधिक आरामदायी सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने 2017 मध्ये वातानुकुलित शिवशाही बस सुरू केली. खासगी लक्झरी बसच्या तुलनेने या बसचे तिकीट दरही कमी असल्याने या बसला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळात आहे. तथापि, पहिल्या अडीच वर्षांतच राज्यात या बसला साडेपाचशेच्या वर अपघात झाले. अपघातांचे हे सत्र अद्याप सुरुच आहे. सप्टेंबरमध्ये सासवड रस्त्यावर उरुळी देवाची येथे शिवशाही आणि कंटेनरचा अपघात झाला होता. यात कंटेनरचालकाचा मृत्यू झाला होता, तर बसचालकासह तीन ते चार प्रवासी जखमी झाले होते. त्यापूर्वी कात्रज घाटातही शिवशाही बसला अपघात झाला होता.
अग्निशमन दलाच्या मार्गात रस्त्यातील दगडांचा अडथळा शिवशाही बस दुर्घटनास्थळी निघाले होते जवान
येरवडा, दि. 1 (प्रतिनिधी) -अग्निशमन दलाने आग लागलेल्या घटनास्थळी तातडीने पोहोचणे गरजेचे असते, यासाठी अग्निशमन दलाचे जवान तत्पर असतात. मात्र, काही ठिकाणी वाहतूक कोंडी तर कधी झोपडपट्टी सारख्या दाटीवाटीच्या ठिकाणी आग लागल्यास त्याठिकाणी अग्निशमन दलाचे वाहन पोहोचण्यातसाठी मोठी अडचण येते, कसरत करावी लागते. परंतु, नगर महामार्गावर शिवशाही बसला लागलेली आग विझविण्यासाठी निघालेल्या अग्निशमन दलाला “प्रशासकीय कारभाराचाच अडथळा’ पार करावा लागला.
नगर रस्त्यावर वाडिया बंगल्यासमोर मंगळवारी सकाळी राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बसला आग लागली, बसने रस्त्यावरच पेट घेतल्याने आग मोठी होती. अग्निशमन दलाला माहिती कळविताच अग्निशमन दलाचे वाहन तातडीने घटनास्थळी निघाले. गोल्फ चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने गुंजन चौकातून हे वाहन गेले. मात्र, या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने तसेच मेट्रोचे काम सुरू असल्याने बीआरटी मार्ग बंदच ठेवलेला आहे या मार्गातून कोणते वाहन जावू नये यासाठी मार्गातच मोठे दगड आडवे टाकण्यात आले आहेत. याच दगडांचा अडथळा अग्निशमनच्या वाहनाला आला.
शास्त्रीनगर चौकात इतर वाहनांनी जाऊ नये यासाठी मोठमोठ्या दगडांचा अडथळा ठेवण्यात आला होता. त्यामुळे अग्निशमन जवानांना हे दगड बाजूला करून मार्ग खुला करावा लागला. त्यानंतर शिवशाही बसला लागलेल्या आगीच्या घटनास्थळी पोहोचता आले. यात वेळ गेल्याने आगीत बसचा बराचसा भाग जळून गेला.
शहरातील अनेक भागात अचानक होणाऱ्या आगीच्या घटनांवेळी अग्निशमन दलाचे वाहन व जवान त्वरित पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत असतात. परंतु, अनेक भागात अडथळा निर्माण होत असतात. परिणामी, आगीमध्ये जास्त नुकसान होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनाना तसेच रुग्णवाहिका अशा सेवेसाठी रस्ता मोकळा ठेवण्यासाठी पोलिसांनी तसेच नागरिकांनाही प्राध्यान्य गरजेचे आहे.