कोथरूड – बावधन परिसरासह उजवी, डावी भुसारी काॅलनी, इंदिरा शंकर नगरी, वेदभवन, मोकाटेनगर यासह अन्य परिसरात मागील आठ ते दहा दिवसांपासून उलट्या, जुलाब, पोटदुखीसारख्या आजरांच्या तक्रारी वाढल्या आहेत. सोसाट्यांना होणारा पाणीपुरवठा दुषीत होत असल्यामुळे हे आजार वाढल्याचे दिसून येते. याबाबत उपयायोजना करून स्वच्छ पाणीपुरवठा करावा अशी मागणी नागरिक करत आहेत. मनविसेचे राज्य संघटक प्रमुख प्रशांत कनोजिया, कोथरूड उपविभाग प्रमुख रमेश उभे आणि बावधन ग्रामपंचायतीचे सदस्य सुर्यकांत भुंडे यांनी निवेदन दिले आहे. बावधन परिसरात चार ते पाच दिवसांपासून पाणी दुषीत तर काहीठिकाणी पाण्यात आळ्या येत आहेत. त्यामुळे उलट्या, जुलाबाचे रूग्ण वाढल्याचे सुर्यकांत भुंडे यांनी सांगितले. भुसारी कॉलनी, इंदिरा शंकर नगरी, वेदभवन परिसर, सौदामिनी, मोकाटे नगर अन्य परिसरातही दुषीत पाणीपुरवठा होता असून, त्याबाबत संबधित अधिकाऱ्यांना निवेदन दिल्याचे प्रशांत कनोजिया आणि रमेश उभे यांनी सांगितले. दरम्यान, या परिसरात फिरता दवाखाना पाठवा, आवश्यक औषधोपचार व वैद्यकीय तपासणी करावी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाशी समन्वय साधून कारणे शोधून उपाययोजना कराव्या, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आले आहे. त्यानुसार गेल्या २४ तासापासून आरोग्य विभागाकडून पाण्याचे नमुने आणि आजारी व्यक्तीची माहिती जमा करण्यात आली आहे. तसेच, स्वच्छ पाणीपुरवठा करण्याबाबत सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.