पुणे – महायुती सरकारने देशातील सर्वाधिक ५२ टक्के परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आणली. वेदांता, टाटा एअरबस, फॉक्सकॉनसारखे प्रकल्प महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेमुळे राज्याबाहेर गेले. काँग्रेस आघाडी वारंवार खोटे बोलत असली, तरी त्यामुळे मतदार भ्रमित होणार नाहीत. मतदारांचा महायुतीने केलेल्या विकासावर विश्वास आहे, असा विश्वास शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला. शिवाजीनगर मतदारसंघात युवा मेळाव्याचे आयोजन केले होते, तसेच खडकी बाजार आणि पीवायसी हिंदू जिमखाना येथील कार्यक्रमांना शिरोळे यांनी उपस्थिती लावली. २०१४ ते २०१९ या कालखंडात महायुती सरकारने महाराष्ट्राला देशात अव्वल क्रमांकावर ठेवले. २०१९ नंतर जनादेशाचा अपमान करून सत्तेत आलेले आघाडी सरकार इतके निष्क्रिय होते, की अडीच वर्षांत त्यांनी गुंतवणूक समितीची बैठकसुद्धा घेतली नाही. हा नाकर्तेपणा झाकण्यासाठी खोटे बोलणाऱ्यांना घरी बसवून भाजपा महायुतीला विजयी करण्याचा संकल्प जनतेने केला आहे, असे आ. शिरोळे म्हणाले. मतदारांना फसवता येईल, असे महाविकास आघाडीला वाटते. मात्र, जनता सजग आहे. मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, महामार्ग, उड्डाणपूल, कोस्टल रोड, अटल सेतू सागरी मार्ग, वाढवण बंदराची मुहूर्तमेढ असे शेकडो मेगा प्रोजेक्टस् महायुती सरकारने केले. पुढच्या पन्नास वर्षांच्या अर्थकारणाचा पाया यातून रचला गेला आहे. गेल्या साडेसात वर्षांच्या काळात प्रगतीचा हा वेग वाढला आहे, हे जनता पाहते आहे, असे शिरोळे यांनी नमूद केले. दीर्घकाळ राज्याच्या सत्तेत असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकसंख्येची प्रचंड वाढ होत असताना पायाभूत सुविधा निर्माण केल्या नाहीत. त्यामुळे शहरीकरणाच्या अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यावर भाजपा महायुतीच गांभीर्याने काम करत आहे. पुढच्या पिढ्यांसाठी रोजगारक्षम, विकासाभिमुख महाराष्ट्र घडवायचा असेल, तर भाजपा महायुती सरकारला पुन्हा निवडून दिले पाहिजे, हे आता मतदारांनी ओळखले असल्याचे शिरोळे यांनी स्पष्ट केले.