Pune News – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) उप-प्रादेशिक कार्यालय (एसआरओ-१) पुण्यातील वाकडेवाडी येथून बारामतीला स्थलांतरीत करण्याच्या निर्णयाला राजकीय पुढाऱ्यांसह पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. या कार्यालय स्थलांतराचा परिणाम थेट प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कमकुवत होण्यावर होऊ शकतो, असे अनेकांचे मत आहे, तसेच प्रत्यक्षात बारामतीत जाणेही शक्य होत नाही, असे या विरोध करणाऱ्या मंडळींचे म्हणणे आहे. भाजपचे आमदार हेमंत रासने यांनी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना पत्र लिहून या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. २३ मार्चला रासने यांनी मुंडे यांना पत्र लिहिले आहे. पुणे शहराची वाढणारी लोकसंख्या आणि विस्तारत असलेल्या औद्योगिक क्षेत्रासाठी हे मंडळ शहरात असणचे आवश्यक आहे. परवानगी आणि तक्रार निवारणासाठी पुणे कार्यालयावर अनेकजण अवलंबून आहेत. ते स्थलांतरीत केल्यास नागरिक, उद्योग आणि पर्यावरण गटांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो, असे पत्रात म्हटले आहे. एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी उपविभागीय कार्यालय २० मार्चपासून बारामती येथे स्थलांतरीत केले आहे. या अधिकारक्षेत्रात पुणे महापालिकेसह भोर, सासवड, दौंड आणि इंदापूरसारख्या क्षेत्रांचा समावेश होतो त्यामुळे प्रभावी देखरेख आणि वेळेवर प्रतिसाद देण्यासाठी पुण्यात या कार्यालयाचे प्रत्यक्ष अस्तित्व कायम राखणे अत्यंत आवश्यक आहे, असे रासने यांनी पत्रात म्हटले आहे. मुंबईतील एमपीसीबी मुख्यालयाने ९ मार्चला जारी केलेल्या एका पत्राद्वारे या निर्णयाला औपचारिक स्वरूप देण्यात आले. कुरकुंभ, बारामती, जेजुरी आणि इंदापूर यासारख्या प्रमुख औद्योगिक क्लस्टर्सच्या जवळ कार्यालय स्थापन करून प्रशासकीय कार्यक्षमता सुधारणे हा या स्थलांतराचा उद्देश आहे, जिथे अलिकडच्या वर्षांत औद्योगिक विकासाला गती मिळाली आहे, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. या स्थलांतरामुळे पुणे जिल्ह्याच्या पूर्व आणि दक्षिण भागांमध्ये जलद तपासणी, उत्तम समन्वय आणि जलद सेवा वितरण शक्य होण्याची अपेक्षा आहे. पूर्वीच्या वाकडेवाडी येथील जागेमुळे दूरच्या औद्योगिक पट्ट्यांपर्यंत पोहोचण्यात दळणवळणाची आव्हाने निर्माण होत होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.