प्रभात वृत्तसेवा पुणे – चार दिवस अगोदर मिरवणूक वेळेत संपण्याचा आग्रह धरणाऱ्या पोलीस आयुक्तांनी मिरवणूक हाताबाहेर गेल्यावर मात्र घुमजाव केले आहे. मिरवणूक कोणत्या वेळी संपते हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही, तर उत्साह, शांततेत मिरवणूक पार पडली ही बाब आमच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली. गणेश विसर्जनाचा संपूर्ण सोहळा शांततेत पार पडला, हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. प्रत्येक मंडळांशी योग्य समन्वय साधल्याने हे यश मिळाले. मिरवणूक किती वाजता संपली, हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही. सर्वांनी मिळून उत्साहामध्ये मिरवणूक पार पडावी ही आमची भूमिका होती, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.सलग १२ दिवस शहरातील गणेशोत्सवासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेऊन सोहळा पार पाडला. यासाठी पोलीस, मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पुणेकरांचे विशेष अभिनंदन करतो असे सांगून पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, मिरवणुकीदरम्यान काही मंडळांत आक्षेपार्ह प्रसंग निर्माण झाले. मात्र पोलिसांनी त्यावर त्वरित तोडगा काढला. मानाच्या गणपतींना दिलेली वेळ पाळली. इतर मंडळांनी थोडा उशीर केला. बाकी मंडळांनीही उत्साहात आणि आनंदात विसर्जन केले. सुरक्षित वातावरणात आणि उत्साहात सोहळा पार पाडणे यास पोलिसांचे प्राधान्य होते, ते साध्य झाले. ढोल-पथकाबद्दल आयुक्त म्हणाले, पथकातील एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या वर्तनास पूर्ण पथकाला जबाबदार धरणे योग्य नाही. मात्र तक्रार आली असून त्यावर विचार करून योग्य ती कायदेशीर पावले टाकू. त्याची कल्पना नव्हती.. गुन्हे शाखेला आंदेकर टोळीने खुनाचा कट रचल्याची माहिती मिळाल्याने पहिला गुन्हा दाखल झाला. मात्र, आरोपी स्वतःच्याच नातवाचा खून करेल, याची कल्पना नव्हती. आता घटना घडली आहे, त्यामुळे जे आरोपी आहेत, त्यांना कायद्याचे परिणाम भोगावे लागतील. काही आरोपींना अटक झाली असून बाकीचे आरोपीही लवकरच गजाआड होतील, असेही आयुक्त यावेळी म्हणाले.