प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्य सरकारने राष्ट्रीय बाजार समिती करण्याबाबतचा निर्णय घेऊन अध्यादेश काढला आहे. मात्र, यामध्ये कामगारांना प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही. त्यामुळे संतप्त माथाडी कामगारांनी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखली आंदोलन करीत राष्ट्रीय बाजाराच्या अध्यादेशाची होळी केली.राष्ट्रीय बाजाराबाबत अध्यादेश काढताना कामगारांना विश्वासात घेतले जाईल. राष्ट्रीय बाजार समितीमध्ये हमाल, तोलणारांचा प्रतिनिधी घेतला जाईल, असे आश्वासन तत्कालीन पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी डॉ. बाबा आढाव यांनी दिले होते. याबाबत दिलेली लेखी प्रत आहे. यानुसार हमाल आणि तोलणारांचा प्रत्येकी एक असे दोन प्रतिनिधी असणार होते. मात्र, प्रत्यक्षात कामगारांचा कोणताही प्रतिनिधी देण्यात आलेला नाही. तर, दुसरीकडे व्यापारी वर्गाचे २ वरून ३ प्रतिनिधी करण्यात आले. कामगारांचा प्रतिनिधी नसल्याने कामगारांना काम करणे अवघड होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कृषि पणन महामंडळाच्या मार्केट यार्ड येथील कार्यालयाबाहेर शासनाने काढलेल्या अध्यादेशाची ज्येष्ठ कामगार नेते डॉ. आढाव यांच्या अध्यक्षतेखाली होळी करण्यात आली. त्यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज कामगार युनियन अध्यक्ष संतोष नांगरे, विशाल केकाणे, संजय साष्टे, सचिन कांदे, दीपक जाधव, अमर रणदिवे, हमाल पंचायतचे चंद्रकांत मानकर, हुसेन पठाण, गणेश पानसरे, नीलेश कुटे, किशोर पावणे, हरिभाऊ खाडे, दत्तात्रय गडदे, तोलणार संघटनेचे संतोष ताकवले, किशोर भानुसगरे यांच्यासह कामगार उपस्थित होते. कामगारांना प्रतिनिधीत्व मिळालेच पाहिजे, कामगार प्रतिनिधींना वगळणाऱ्या सरकारचा निषेध असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. प्रत्येक बाजार समितीमध्ये नोंदणीकृत माथाडी कामगार आहेत. या कामगारांचे प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी राष्ट्रीय बाजार समितीमध्ये कामगार प्रतिनिधी मिळाला पाहिजे. प्रतिनिधी न मिळाल्यास महाराष्ट्रातील सर्व मार्केट यार्डात बेमुदत बंद पुकारला जाईल. – संतोष नांगरे, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी महाराज कामगार युनियन