प्रभात वृत्तसेवा पुणे – लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन सादर केले. नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकम विभागाचे मंत्री म्हणून शिंदे यांनी याप्रकरणी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.टिळक स्मारक मंदिर येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या शिंदे यांना लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी समितीच्या शिष्टमंडळाच्या वतीने परिसरातील विकासकामे, पुनर्विकास प्रक्रिया, नागरिकांच्या मालकी हक्काशी संबंधित प्रश्न आणि मूलभूत सुविधांच्या अभावाविषयी माहिती देण्यात आली. या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी निवेदन वाचून काही मुद्द्यांवर थेट प्रश्न विचारले आणि सविस्तर माहिती घेतली. आमदार हेमंत रासने यांचे शिफारसपत्र निवेदनासोबत जोडले नव्हते, ते तात्काळ जोडण्याचे निर्देश त्यांनी दिले. लोकमान्यनगरचा प्रश्न नगरविकास मंत्रालयाच्या माध्यमातून नक्की सोडवू, असे आश्वासनही दिले. या शिष्टमंडळात ॲड. गणेश सातपुते, हेमंत पाटील, कपिल पाटील, वैभव ललवाणी, कुणाल पाटील, ज्योती गुजर, सुनील कुसुरकर आणि मुकेश वैराट यांचा समावेश होता.