Pune News | मतदार याद्यांवर लक्ष ठेवा; काम केले तरच तिकीट – राज ठाकरे

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे. सर्वांनी आपापल्या भागातील मतदार यादीवर लक्ष ठेवावे. मतदार यांद्याचा सखोल अभ्यास करुन त्याबाबत प्रभागातील लोकांची जनजागृती करा, असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरील केलेल्या आरोपांना ठाकरे यांनीही पाठिंबा दर्शविला आहे.भवानी पेठेतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या सभागृहात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मनसेचे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, साईनाथ बाबर, अजय शिंदे, किशोर शिंदे, गणेश सातपुते, बाळा शेडगे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपवर टिका करण्याचा धडाकाच लावला आहे. निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून मोठ्या प्रमाणात मतांची चोरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या आरोपांवर ठाकरे यांनीही भाष्य केले आहे. ठाकरे म्हणाले की, २०१६-१७ पासून मी सांगतोय की, मतांमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड आहे.
याबाबी मी शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यासमोरही मांडल्या होत्या. पण, ऐनवेळी त्यांनी पाठ फिरवली. हा मुद्दा जागतिक स्तरावर न्यावा लागेल. लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर परदेशातूनही दबाव येईल अन् सत्ताधाऱ्यांना जाग येईल.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकालाबाबतही प्रश्नचिन्हच निर्माण झाले होते.
जे विजयी झाले त्यांना निकाल पचनी पडत नव्हते आणि जे पराभूत झाले त्यांना ते मान्य नव्हते. हा सगळा मतांचा गोंधळ होता, असे म्हणत ठाकरे यांनी निवडणूक आयोगावरही टिका केली. राहुल गांधी यांनी मतचोरीचे मुद्दे उपस्थित केल्यानंतरही निवडणूक आयोगाने चौकशी का केली नाही? कारण, अशी चौकशी झाली तर गेल्या १० ते १२ वर्षांतील गैरप्रकार उघड होतील, असेही ठाकरे यांनी नमूद केले.
२० दिवसांनी पुन्हा बैठक…
मतदार याद्यांमधील घोळ उघडकीस येत असल्यामुळे आता सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, इच्छुकांनी मतदार याद्यांचा अभ्यास करा. त्यावर नीट काम करा. जास्तीत जास्त बीएलओ नेमावेत, अशा सूचनाही ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
२० दिवसांनी पुन्हा बैठक घेऊन मतदार यादीवर कोणी कोणी काम केले याची माहिती घेणार असून त्यांचाच निवडणुकीसाठी विचार केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ज्यांना महापालिका निवडणूक लढवायची आहे त्यांनी हात वर करा, अशा सूचना देवून त्या सर्वांचे फोटोही काढण्यात आले आहे.
वाहतूक कोंडीमुळे पुण्याचे वाटोळे…
पुण्यातील वाहतुक कोंडीचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच शनिवारी मोठा फटका बसला. त्यामुळे ते भडकले. वाहतूक कोंडीमुळे मुंबईचे वाटोळे झाले. आता, पुण्याचेही वाहतूक कोंडीमुळे वाटोळे होण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीच्या समेस्येवर अनेकदा बोललो आहे.
मात्र, समस्या काही सुटलेली दिसत नाही. वेळीच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे अन्यथा पुण्याचेही वाटोळे होण्याचा धोका आहे, असे ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट सांगितले.




