Pune News : पंढरीच्या वारकऱ्यांसाठी ‘डॉ दुधभाते नेत्रालय आणि आर टी ओ पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी शिबिर
पावसाळा सुरू होताच वातावरणातील आर्द्रता वाढते आणि त्यासोबतच डोळ्यांचे विविध संसर्गजन्य आजार डोके वर काढू लागतात. याच काळात लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करत असतात.

Pune News : पावसाळा सुरू होताच वातावरणातील आर्द्रता वाढते आणि त्यासोबतच डोळ्यांचे विविध संसर्गजन्य आजार डोके वर काढू लागतात. याच काळात लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करत असतात.
लांबचा प्रवास, धूळ, पाऊस, चिखल, प्रदूषण आणि सततचा थकवा यामुळे वारकऱ्यांच्या डोळ्यांवर ताण येण्याची शक्यता अधिक असते. अशा परिस्थितीत डोळ्यांचे आरोग्य जपणे तितकेच महत्त्वाचे असल्याने डॉ. दुधभाते नेत्रालय आणि आरटीओ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी आणि भाविकांसाठी विशेष मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक ७ जुलै ते १४ जुलै २०२६ या कालावधीत देहू, आळंदी, विश्रांतवाडी, फुलेनगर, सासवड आणि जेजुरी येथे हे मोफत नेत्रतपासणी शिबिर भरविण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये डोळ्यांची प्राथमिक तपासणी, दृष्टी तपासणी तसेच आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले जाणार आहे.
वारकरी, भाविक आणि सर्वसामान्य नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. अनिल दुधभाते आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनायक साखरे यांनी केले आहे.
पावसाळ्यात डोळ्यांमध्ये लालसरपणा, खाज येणे, पाणी येणे, जळजळ होणे, डोळे चिकटणे किंवा दृष्टी धूसर होणे अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. विशेषतः कंजंक्टिव्हायटिस (डोळे येणे), अॅलर्जी आणि बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाण या दिवसांत वाढते.
त्यामुळे वारकऱ्यांनी किंवा नागरिकांनी डोळे वारंवार चोळणे टाळावे, स्वच्छ रुमाल किंवा टिश्यूचा वापर करावा, स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत आणि इतरांचा टॉवेल किंवा रुमाल वापरणे टाळावे. संसर्गाची लक्षणे आढळल्यास तातडीने नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.





