प्रभात वृत्तसेवा पुणे – संतूर, सतार आणि गायनाने सवाईचा तिसरा दिवस रंगतदार झाला. युवा संतूरवादक सत्येंद्रसिंह सोलंकी यांचे बहारदार संतूरवादन आणि त्यानंतर श्रीनिवास जोशी यांनी गायलेला राग पूरिया, अणुरेणिया थोकडा । तुका आकाशा एवढा.. हा सादर केलेला अभंग, उस्ताद शुजात खाँ यांची सतार आणि विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे यांचे गायन यांनी सूरांची बहार आणली. आर्य संगीत प्रसारक मंडळ आयोजित ७१ वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या पूर्वार्धात सत्येंद्रसिंह सोलंकी यांच्या संतूर वादनाचा आनंद रसिकांनी घेतला. सत्येंद्रसिंह हे पं. ओमप्रकाश चौरसिया यांचे शिष्य आहेत. त्यांनी वादनासाठी दाक्षिणात्य राग वाचस्पती निवडला होता. संतूरला पखवाजाची जोड देऊन सादर केलेल्या रागाने वादनात अधिक रंगत आणली. मिश्र पहाडीमधील अतिशय कर्णमधूर धून ऐकवून त्यांनी वादनाची सांगता केली. त्यांना रामेंद्रसिंह सोलंकी (तबला) आणि अखिलेश गुंदेचा (पखवाज) यांनी साथसंगत केली.त्यानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आणि सुपुत्र श्रीनिवास जोशी यांचे गायन झाले. त्यांना पुत्र विराज यांनी साथ दिली. श्रीनिवास जोशी यांनी राग पूरिया मध्ये एकतालातील पिया गुणवंता आणि त्रितालातील घडिया गिनत या रचना सादर केल्या. त्यानंतर राग सुहा कानडा मध्ये ए दाता हो… ही झपतालातील रचना रंगतदार होती. संत तुकाराम महाराज यांच्या अणुरेणिया थोकडा। तुका आकाशाएवढा…’ हा मूळ भीमसेनजींनी गायलेला अभंग सादर करून वातावरणात भक्तीरस निर्माण करत सादरीकरणाचा समारोप केला. पांडुरंग पवार (तबला), अविनाश दिघे (हार्मोनिअम), गंभीर महाराज (पखवाज), माऊली टाकळकर (टाळ), लक्ष्मण कोळी आणि मोबिन मिरजकर (तानपुरा) यांनी साथ केली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.