Chitale Bandhu Mithaiwale : आपल्या चवदार व कुरकुरित बाकरवडीने जगभरात लोकप्रियता मिळवलेल्या व भारतातील प्रसिद्ध मिठाई, नमकीन व स्नॅक्सचे निर्माते असलेल्या चितळे बंधू मिठाईवाले यांच्या वतीने भोर तालुक्यातील रांजे येथे ‘रांजे व्हिजन पार्क’ या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. सदर प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या १६ एप्रिल रोजी संपन्न होईल, अशी माहिती चितळे बंधू मिठाईवाले या संस्थेचे भागीदार व चितळे कुटुंबातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे इंद्रनील व केदार चितळे यांनी आज झालेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना इंद्रनील चितळे म्हणाले, “हा नवीन, अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प भारतातील तसेच परदेशांतील बाजारपेठांमध्ये आमच्या विस्तार योजनेसाठी आवश्यक असलेल्या उत्पादनाच्या गरजा पूर्ण करेल. पॅक बंद खाद्यपदार्थांच्या क्षेत्रातील जागतिक मानके लक्षात घेऊनच या प्रकल्पाची रचना आणि उभारणी करण्यात आली आहे. Chitale Bandhu Mithaiwale या प्रकल्पाला एफएसएससी २२००० हे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असलेले आणि ग्लोबल फूड सेफ्टी इनिशीएटिव्ह मानकांवर आधारित अन्न सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्याचबरोबर या उत्पादन प्रकल्पाला युएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन आणि ब्रिटीश रिटेल कन्सोरशियम यांसारख्या जागतिक अन्न सुरक्षा मानकांनुसार देखील प्रमाणित करण्यात आले आहे.” सुमारे २५ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या रांजे व्हिजन पार्कमध्ये मिठाई आणि नमकीनसाठी दोन स्वतंत्र उत्पादन केंद्रांची उभारणी करण्यात आली असून ते कार्यन्वित देखील करण्यात आले आहेत. या उत्पादन केंद्रांची क्षमता दररोज ४० टन मिठाई आणि नमकीनचे उत्पादन करण्याची आहे. रांजे व्हिजन पार्कच्या उभारणीमध्ये आतापर्यंत २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे, अशी माहिती इंद्रनील चितळे यांनी दिली. पुढे बोलताना केदार चितळे म्हणाले, “या पार्कचे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे ग्राहकांना पाहण्यासाठी खुले असेल. एक्सपीरियन्स सेंटर सारख्या संकल्पनेवर आधारित असलेल्या या पार्कमध्ये ग्राहकांना चितळे बंधू मिठाईवाले यांच्या सर्व उत्पादनांना एकाच ठिकाणी बघता येईल, त्यांची चव घेता येईल. तसेच नजीकच्या भविष्यात येथे एका कॅफेचीही योजना आखण्यात आली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या पार्कमध्ये ग्राहकांसाठी व्ह्यूइंग गॅलरीज अर्थात निरीक्षण कक्ष उभारण्यात आले आहेत. या सुविधेमुळे ग्राहक चितळे बंधू मिठाईवाले यांची उत्पादने कशा प्रकारे संपूर्णतः स्वयंचलित उत्पादन प्रक्रियेच्या माध्यमातून तयार केली जातात व त्यादरम्यान होणारे स्वच्छतेचे व जागतिक दर्जाचे निकष यांचे काटेकोर पालन कसे केले जाते हे प्रत्यक्ष स्वतः पाहू शकतील.” याबरोबरच या ठिकाणी चितळे बंधू मिठाईवाले यांचा आजवरचा प्रवास दर्शवण्यासाठी तयार करण्यात आलेली १०० मीटर लांबीची विशेष भिंत ग्राहकांसाठी नक्कीच कुतूहलाचा विषय ठरेल. उत्पादन प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्यासाठी प्रोत्साहित करणारा हा उपक्रम, आमच्या ग्राहकांना केवळ आश्वस्तच करणार नाही, तर ग्राहकांच्या पिढ्यानपिढ्यांनी आमच्याशी जोपासलेले विश्वासाचे दृढ नाते अधिकच बळकट करेल अशी आशा केदार चितळे यांनी व्यक्त केली. लवकरच, ग्राहक या ‘रांजे व्हिजन पार्क’ला भेट देण्यासाठी संस्थेच्या वेबसाईटच्या माध्यमातून नोंदणी करू शकतील. भविष्यातील विस्तार योजनांविषयी माहिती देतांना इंद्रनील चितळे म्हणाले की, सध्या चितळे बंधू मिठाईवाले यांच्या वतीने वेगवेगळ्या ४५० पदार्थांचे उत्पादन करण्यात येते. रिटेल स्टोअर, क्विकसर्व्हिस व फाईन डाइन रेस्टॉरंटसच्या माध्यमातून ही उत्पादने जास्तीतजास्त ग्राहकांपर्यंत पोहोचावी यावर आमचा भर असेल. आजमितीला आमची उत्पादने देशाच्या १० राज्यांमधील सुमारे १ लाख २५ हजार टच प्वॉइंटसच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत. टच प्वॉइंटसची ही संख्या येत्या ३ वर्षात ५ लाखांवर नेण्याची आमची योजना आहे. सध्या निर्यातीतून होणारा व्यवसाय हा सुमारे ८ ते ९ टक्के असून येत्या २ ते ३ वर्षात तो २० टक्क्यांपर्यंत नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे देखील चितळे यांनी नमूद केले.