प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोचे काम हाती घेतले आहे. हे काम गतीने सुरु आहे. प्राधिकरणाकडून भविष्यात या मेट्रोचा विस्तार लोणी काळभोर, पुरंदर विमानतळापर्यंत करण्याचे प्रस्तावित आहे. आता राज्य शासनाने एक यापुढील पीएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पाच्या विस्ताराची जबाबदारी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन अर्थात महामेट्रोकडे सोपविली आहे. पीएमआरडीएकडून सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. या २३.३ किलोमीटर लांबीच्या मार्गात २३ स्थानके आहेत. मेट्रोची एकूण प्रवाशी क्षमता एक हजार असणार आहे. सध्या या प्रकल्पाचे ९० टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले असून उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे. चालू वर्षी जुलै महिन्यात मेट्रोची पहिली चाचणी घेण्यात आली. या मेट्रोचे काम पूर्ण होऊन ती धावण्यास मार्च २०२६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. ही मेट्रो पीपीपी तत्वावर असल्याने एकाच टप्प्यात माण-हिंजवडीपासून शिवाजीनगर स्थानकापर्यंत सुरु करण्यात येणार आहे. मेट्रो मार्गिका तीनचे विस्तारीकरण करणे आवश्यक होते. त्याकरिता पीएमआरडीए प्रयत्न करत होते. मेट्रो विस्तारीकरणाची जबाबदारी राज्य सरकारने महामेट्रोकडे दिली आहे. त्यामुळे विद्यमान प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पीएमआरडीएची जबाबदारी संपणार आहे. त्यानंतर प्राधिकरणाच्या हद्दीतील मेट्रो विस्तार तसेच नवीन मार्ग आखणी ही जबाबदारी महामेट्रोची असणार आहे.