Pune Liquor Case : पुणे विषारी दारू मृत्यूकांडात मोठा खुलासा! निलंबित पोलिसांचे मुख्य आरोपीला तब्बल १५० कॉल्स
Pune Liquor Case : पोलिसांकडून अवैध व्यवसायांच्या हालचालींची माहिती दिली जात असल्याचा संशय; ८ आरोपी अटकेत, सीआयडीकडून कसून चौकशी सुरू.

Pune Liquor Case – पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू मृत्यूकांडप्रकरणी निलंबित केलेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांनी मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापती याच्याशी तब्बल १५० वेळा दूरध्वनीवरून संपर्क साधल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे अवैध दारू व्यवसायाला पोलिसांचे संरक्षण होते का? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
विषारी दारू प्राशनामुळे १६ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी आरोपी आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांमधील साटेलोटे समोर येत आहे. तपासादरम्यान मुख्य आरोपी राधेश्याम हरीराम प्रजापतीच्या मोबाइलचे कॉल डिटेल्सची तपासण्यात आले.
त्यातून उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील अजित काळे आणि सुमित वाघ, तसेच यवत पोलिस ठाण्यातील रामदास जगताप व सुभाष डोईफोडे यांच्याशी त्याचा सातत्याने संपर्क असल्याचे स्पष्ट झाले. या चौघांनी मिळून प्रजापतीशी तब्बल १५० वेळा संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. या संभाषणांतील तपशील, अवैध दारू व्यवसायाच्या हालचालींची माहिती देण्यात येत होती का?
कारवाईपूर्वी आरोपींना सतर्क केले होते का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम तपास यंत्रणांनी सुरू केले आहे. दरम्यान, संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला असून आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता आरोपी आणि पोलिसांमधील संबंधांचाही बारकाईने तपास केला जात आहे.
वरिष्ठांना अभय?
या प्रकरणात चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असली, तरी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्यावर निलंबनाऐवजी केवळ नियंत्रण कक्षात बदलीची कारवाई करण्यात आली आहे.






