प्रभात वत्तसेवा वाल्हे – दिवे घाट ते नीरा या ५० किलोमीटर पालखी मार्गावरील चौपदरीकरण काम अद्यापपर्यंतही सुरु असून यातील झेंडेवाडी ते जेजुरी मार्गावरील जवळपास सर्व उड्डाणपुलाची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, मागील अनेक वर्षांपासून अरूंद पालखी महामार्ग म्हणून प्रचलित असलेल्या जेजुरी ते पिसुर्टी फाटा (ता. पुरंदर) पालखी मार्गावरील उड्डाणपुलांचे कामे तसेच दौंडज ते वाल्हे येथील काही ठिकाणी पालखी मार्गाची कामे अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहेत. पालखी महामार्गावरील जुन्या जेजुरी येथील उड्डाणपूल अद्यापपर्यंत पूर्ण झाला नसल्याने व सेवा रस्ताही अरूंद व ओबडधोबड अवस्थेत आहे. जुन्या जेजुरी येथील उड्डाणपुलाचा सेवा रस्ता पावसाच्या पाण्याने जलमय होत असल्याने जेजुरी ते भोरवाडी फाटा अंतरापर्यंत प्रवाशांची वाट थोडी बिकट होत आहे.दौंडज खिंड ते दौंडज हद्दीतील कदम वस्तीपर्यंत पालखी मार्गाचे काम गतीने व उत्तम झाले आहे. कदम वस्तीच्या पुढे ते दौंडज उड्डाणपूल येथील रस्त्याचे काम मागील अनेक दिवसांपासून रखडलेल्या अवस्थेत होते. मात्र, सद्यःस्थितीत ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न संबंधित विभागाकडून करण्यात येत आहे.पिसुर्टी फाटा येथून बाह्यवळण असलेला पालखी मार्ग अद्यापपर्यंत अपूर्ण अवस्थेत आहे. बाह्यवळण मार्गाच्या रस्त्याचे काम पूर्ण अवस्थेत आहे. मात्र, रेल्वेच्या उड्डाणपुलाजवळचे काम अद्यापपर्यंत रखडले असल्यामुळे मार्गावरून वाहतूक अद्यापही सुरू केली नाही. वाल्हे ते नीरा-लोणंद या जुन्याच व अरूंद पालखी महामार्गावरून वाहतूक सुरू आहे. रेल्वेगेट बंद झाल्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वायाला जात असून मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. “काही तांत्रिक अडथळ्यांमुळे पुलाच्या कामास उशिर झाला आहे; मात्र सद्यःस्थितीत पुलाचे काम लवकरच पूर्णत्वास जाईल. हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.” – राजेंद्र ढगे, प्रकल्प अधिकारी