कोळवण – वाळेन मार्गावरील महत्त्वाचा पूल दोन जवळपास महिन्यापूर्वी पाठबंधारे विभागाच्या वतीने सुरक्षेच्या कारणामुळे पाडण्यात आला परंतु वाळेन व डोंगरगाव या दोन गावांतील नागरिकांना जाण्या येण्याकरीता दुसरा मार्ग उपलब्ध नसताना सुद्धा नागरिकांचा विचार न करता प्रशासनाने पुलाच दोन्ही बाजूचा स्लॅब पाडण्यात आला. परंतु हा पूल जर कोल्हापूर पद्धतीचा पाटबंधारा होता तर मग मागील अनेक वर्षापासून या पुलावरून कोळवण वरून वाळेन, डोंगरगाव येथील नागरिक बेकायदेशीर जात येत होती का? यावर याआधी पाटबंधारे विभागाने या पुलावरून जाण्यास वाहनास बंदी का घातली नाही आज रोजी हा पूल कमकुवत झाला आहे असे सांगून तो बंद करण्यात आला परंतु या ठिकाणी दुसरा पूल होणे गरजेचे आहे. जोपर्यंत दुसरा पूल मंजूर होत नाही तोपर्यंत या पुलावरून नागरिकांना जाण्या येण्यासाठी चालू ठेवणे आवश्यक होता परंतु पाटबंधारे विभाग हे बांधकाम विभागाकडे बोट करत आहे की हे काम त्यांच्या आहे तर बांधकाम विभाग पाटबंधारे बोट करत आहे. यामुळे मुळशी मधील प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेला दिसत आहे. सध्या प्रशासनाकडून सरकारी दवाखान्याच्या बाजूने पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे, मात्र हा रस्ता पूर्णपणे मातीचा बनविण्यात आलेला असल्याने त्याच्या टिकाऊपणाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते, पावसाळा सुरू झाल्यानंतर हा मातीचा रस्ता पूर्णपणे वाहून जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाळेन व डोंगरगाव या दोन गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र अद्याप या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली नाही, त्यामुळे या कामासाठी आवश्यक असलेली वर्क ऑर्डरही अद्याप निघालेली नाही. परिणामी पुलाचे प्रत्यक्ष बांधकाम कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितता कायम आहे. म्हणून प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पुलाला लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता देऊन कामाला सुरुवात करावी, अशी मागणी वाळेन व डोंगरगाव येथील ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. अन्यथा येत्या पावसाळ्यात या दोन गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोळवण वाळेन दरम्यान असलेला पूल हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असून वाहतुकीसाठी नाही या पुलाची मुदत संपली असून जीवित हानी होऊ नये म्हणून आम्ही साईट स्लॅब तोडले आहेत – किशोर चव्हाण, सहाय्यक अभियंता, श्रेणी 2, मुळशी पुलाचे काम आमच्यावतीने प्रस्तावित केले आहे परंतु अजून मंजुरी मिळालेली नाही. – साळुंके, सहाय्यक अभियंता मुळशी पावसाळ्या पूर्वी पुलाच काम नाही झाल्यास आमच्या शिक्षणावर परिणाम होण्याची भिंती निर्माण झाली आहे आम्हाला शिक्षणाकरिता कोळवण, पौड , पिरंगुट,पुणे अशा ठिकाणी जावे लागते त्यामुळे याकडे शासनाने लक्ष घालून नवीन पूल तयार करण्यात यावा. – हर्षल जोरी, विद्यार्थी पुलाचे काम सुरू झालेले नसल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. पावसाळ्यात मातीचा पर्यायी रस्ता वाहून गेल्यास वाळेन व डोंगरगाव या दोन गावांतील नागरिकांचे दळणवळण पूर्णपणे खंडित होण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फटका शाळकरी मुले, शेतकरी, रुग्ण आणि दैनंदिन कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांना बसू शकतो. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून तत्काळ पूल तयार करण्यास सुरुवात करावी. – गणेश मोढवे, वाळेन ग्रामस्थ