शिरूर : साबळेवाडी (ता. शिरूर) येथील अतिक्रमण हटवण्याची कारवाई झाल्यानंतर आता चांडोह गावातील अतिक्रमण कधी हटवले जाणार, याबाबत नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. चांडोह येथे काही व्यावसायिकांनी सार्वजनिक जागांवर रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर बांधकामे करून व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या अतिक्रमणांविरोधात एका नागरीकाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारीनुसार, चांडोह गावात रस्त्यालगत वळणावर काही लोकांनी बांधकाम करून त्यास पुढे पत्राची खोली काढून अतिक्रमण केले आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच याठिकाणी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करून दुकाने सुरू केले आहे. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयींचा विचार करून संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित चौकशी करून अतिक्रमण काढणे बाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. साबळेवाडी येथील कारवाईनंतर प्रशासनाने आता चांडोह गावातील बेकायदेशीर अतिक्रमण ताबडतोब काढून टाकावे , अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.