Pune Election : आज रात्री १० नंतर प्रचाराची सांगता! पण ‘या’ एका सवलतीने उमेदवारांची धाकधूक वाढली
Pune Election : जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी आणि १४६ गणांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान; गुरुवारी रात्री १० वाजता प्रचाराची सांगता.

Pune Election – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गुरूवारी (दि.5) जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. नियमानुसार रात्री १० वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारचा जाहीर, सभा प्रचार करता येणार नाही. मात्र, जाहीर प्रचार संपल्यानंतर उमेदवारांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन वैयक्तिक संपर्क साधून प्रचार करण्यास परवानगी असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी आणि पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मतदानाच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार थांबविण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिले होते. त्यानुसार आज रात्री १० वाजता जाहीर प्रचार थांबेल. यानंतर प्रत्यक्षात छुप्या प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यात एकही मोठी जाहीर सभा किंवा भव्य प्रचार सभा आयोजित करण्यात आलेली नाही. या निवडणुकीत प्रतिस्पर्धी असणाऱ्या भाजप, शिवसेने सुद्धा कुठल्याही मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा आयोजित केल्या नाहीत. केवळ काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या काही मोजक्याच सभा पार पडल्या.
त्यामुळे बहुतांश ठिकाणी प्रचार साध्या पद्धतीने, वैयक्तिक संपर्क, बैठका आणि गाठीभेटींच्या माध्यमातून झाला आहे.जाहीर प्रचाराचा गुरुवारी शेवटचा दिवस असल्याने उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी शेवटच्या क्षणी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जाणार आहेत. प्रमुख पक्षांनी शेवटच्या दिवशी, प्रचार फेरी, दुचाकी रॅली, बूथनिहाय नियोजन,
मतदार यादी पडताळणी, बाहेर गावी असणाऱ्या मतदारांशी संपर्क साधण्याच प्रयत्न केला जाईल. रात्री १० नंतर मात्र मिरवणुका, जाहीर सभा, लाऊडस्पीकरचा वापर, बॅनर-फलकांचे प्रदर्शन आदींवर पूर्णपणे बंदी राहणार आहे.दरम्यान, जाहीर प्रचार बंद झाल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन वैयक्तिक भेटी घेऊन प्रचार करण्यास मुभा असल्याने पुढील दोन दिवस डोअर-टू-डोअर प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे.
कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधण्यावर सर्वच पक्षांचा भर राहणार आहे. निवडणूक प्रशासनाने या काळात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.





