पुणे जिल्हा : शेटफळ तलाव भरण्यासाठी पाणी सोडणार – हर्षवर्धन पाटील

वीर धरणातून आवर्तन
इंदापूर : शेटफळ हवेली तलाव भरून घेण्यासाठी वीर धरणातून रविवारी (दि. 20) सकाळी नीरा डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात येणार असून हे पाणी शेटफळ तलावात सोमवारी (दि. 22) रात्रीपर्यंत पोहोचेल. शेटफळ तलाव 100 टक्के क्षमतेने भरून घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि.20) दिली.
पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एम. डुबल यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांनी शेटफळ तलाव व इतर तलाव भरून घेणे संदर्भात चर्चा शनिवारी सकाळी केली. भाटघर धरणामध्ये शनिवारी सुमारे 42 टक्के पाणीसाठा झालेला आहे.
त्यामुळे शेटफळ तलाव भरून घेण्यासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याने शेटफळ, भोडणी, सुरवड, वकीलवस्ती, बावडा, पिठेवाडी, निरनिमगाव, कचरवाडी(बा.), सराटी, लाखेवाडी या लाभक्षेत्रातील दहा गावांमधील शेतीच्या पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
ते टँक भरून घेणार
नीरा डावा कालव्यामधून पाण्याने वरकुटे खुर्द तलाव, वाघाळा तलाव, वालचंदनगर पाणी टँक व घोलपवाडी साठवण टँक हेही भरून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.





