दुबार व बोगस नावे आता कमी होण्याच्या आशा
पुरंदरच्या तहसीलदारांना आदेश; निगडे यांच्या बाजूने निकाल
नीरा – सांसद आदर्श ग्राम गुळुंचे (ता. पुरंदर) या गावात बेभरवशी व नियमबाह्य कामांची अनेक प्रकरणे बाहेर येत असताना आता प्रशासन देखील या कामाकडे डोळेझाक करत असल्याचे दिसून आले आहे. बोगस व दुबार नावे मतदार यादीत समाविष्ट करून स्थलांतरित नावे कमी न केल्याने पंचवार्षिक निवडणूकच एकतर्फी झाल्याची तक्रार करणाऱ्या अक्षय व नितीन निगडे यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आल्याने संपूर्ण गावातील मतदारांची पडताळणी करण्याचे आदेश मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे दुबार व बोगस नावे कमी होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
गावात स्थलांतरित व बोगस नावे यादीत असल्याने असे मतदार केवळ मतदानापुरतेच गावात येऊन मतदान करत. अनेकांची नावे ते वास्तव्याला असलेल्या गावाच्या मतदार यादीत देखील आहेत. अनेकांनी त्या गावात शासकीय योजनांचा लाभ घेतलेला आहे. या सर्व मतदारांचा फायदा गावातील एकाच गटाला होत असल्याने व प्रशासनाने नियमाप्रमाणे काम न केल्याने मतदान अधिकारी व बीएलओ यांच्यावर गुन्हे नोंद करण्याची याचिका अक्षय निगडे व नितीन निगडे यांनी दाखल केली होती. त्यावर जिल्हाधिकारी यांनी निकाल दिला आहे. मतदारांची पडताळणी करावी, 18 वर्षावरील व्यक्तींची नोंदणी करावी, तसेच दुबार व स्थलांतरित नावे कमी करून यादीचे शुद्धीकरण करावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
…अन्यथा ग्रामपंचायत निवडणूक घेऊ नका
जोपर्यंत मतदार यादी शुद्ध होत नाही व प्रभाग रचना नियमाप्रमाणे केली जात नाही तोवर ग्रामपंचायत निवडणूक घेऊ नये. दोन मतदान कार्डे असणे हा गुन्हा असून नियमाप्रमाणे काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद होणे आवश्यक आहे असे अर्जदार नितीन निगडे यांनी सांगितले.
काय आहे दुबार नावांचे प्रकरण –
राजकीय फायद्यासाठी काहींनी मतदार यादीतून कामानिमित्त, तसेच लग्न होऊन सासरी गेलेल्या विवाहितांची नावे गेल्या 20 वर्षांपासून कमीच केली नाहीत. अशा स्थलांतरित, बोगस मतदारांची संख्या जवळपास दोनशेच्या आहे. बीएलओ व निवडणूक अधिकाऱ्यांनी कायम वेळा मारून नेल्या. अनेक शाळांच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांची नावे मतदार यादीत तशीच असून, शिक्षक व कर्मचारी गावात नसताना त्यांची नावे कमी करण्यात आली नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीला गाड्या पाठवून मतदानापुरते या मतदारांना गावात आणले जाते. गावाच्या विकासाशी देणेघेणे नसणारे असे मतदार प्रलोभनांना बळी पडतात व मतदान करतात. ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल दहा-वीस मतांवर लागतो.