मंचर : राजकारणात कुणीही कुणाचा दीर्घकाळ शत्रू नसतो किंवा मित्र नसतो असे नेहमीच बोलले जाते याचाच प्रत्यय सोमवार, दि १३ रोजी आंबेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र थापलिंग येथील यात्रेत आला. काही दिवसांपूर्वी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवलेले कट्टर विरोधक माजी मंत्री दिलीप वळसे पाटील व देवदत्त निकम हे एकाच मंचावर पाहावयास मिळाले. विशेषत: यावेळी वळसे पाटील यांनी निकम व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून यात्रेचे चांगले नियोजन केले आहे, असे वक्तव्य केले. वळसे पाटील व निकम देवाच्या यात्रेनिमित्त अनेक दिवसानंतर एकाच मंचावर दिसल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या असून मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहेत. माजी मंत्री आणि विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांचे देवदत्त निकम हे शिष्य म्हणून ओळखले जातात. पूर्वी एकाच पक्षात काम करणारे गुरु, शिष्य आता राष्ट्रवादी पक्षात फूट पडलेल्या दोन वेगवेगळ्या गटात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होता. त्यावेळेस वळसे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीपासून देवदत्त निकम यांनी पक्षात काम केले आहे. त्यानंतर वळसे पाटलांच्या माध्यमातून निकम यांना विविध पदांवर काम करण्याची संधी देखील मिळाली आहे. दरम्यानच्या काळात स्थानिक बाजार समिती निवडणुकीत झालेला वाद व त्यातून वळसे पाटील व निकम यांच्यात निर्माण झालेली दरी व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेले दोन गट यामुळे वळसे पाटील व निकम हे एकमेकांचे कट्टर विरोधक झाले. वळसे पाटील अजित पवार गटात तर देवदत्त निकम हे शरद पवार गटात कार्यरत असल्याने पक्षाच्या विविध कार्यक्रमात एकमेकांवर जोरदार टीका केली जात होती. काही दिवसापूर्वीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील व देवदत्त निकम हे एकमेकांच्या विरोधात उभे होते. त्यावेळी निकम व वळसे पाटील यांनी एकमेकांवर जोरदार टीकाटिप्पणी केली होती. तसेच दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते देखील एकमेकांना भिडत होते. वळसे पाटील कुटुंबाचे श्रीक्षेत्र थापलिंग हे कुलदैवत असल्याने वळसे पाटील अगदी लहानपणापासून दरवर्षी श्रीक्षेत्र थापलिंग देवाच्या दर्शनाला येत असतात. यावर्षी त्यांनी देवाच्या दर्शनाला येत घाटामध्ये नवसाचे बैलगाडे पाहण्याचा आनंद घेतला. … घोषणा, अन् आभार यावेळी वळसे पाटील यांनी आपल्या भाषणात म्हणाले बोलताना आमदार, मंत्री म्हणून काम करत असताना शासकीय निधीतून थापलिंग गडावरील विविध विकास कामासाठी निधी आणला होता. आता मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू आहे. श्रीक्षेत्र थापलिंग गडावरील नियोजित खंडोबा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या भाग विकास निधीतून पहिला टप्प्यात २५ लाख रुपये आणि दुसरा टप्प्यात २५ लाख असे एकूण, ५० लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी वळसे पाटलांनी निधी देणार असल्याची घोषणा करतात उपस्थित बैलगाडा शौकिनांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनीही टाळ्या वाजवून वळसे पाटलांनी कारखान्याच्या माध्यमातून देऊ केलेल्या निधी घोषणेचे स्वागत करून एक प्रकारे त्यांचे आभार मानल्याचे दिसून आले.