Pune: घटस्फोटानंतर मुलाच्या भेटीवरून आई-वडिलांमध्ये वाद; न्यायालयात पोहोचले प्रकरण, यशस्वी समुपदेशनामुळे ‘तडजोड’

पुणे – घटस्फोटानंतर मुलाला भेटण्याच्या कारणावरून निर्माण झालेले वाद पुन्हा न्यायालयात पोहोचले. मात्र, वाद सुरूच राहिल्यास मुलाच्या भवितव्य, मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे दोघांना समुपदेशनात पटवून देण्यात आले. पतीने त्याला न भेटण्याचे मान्य केले. दोघातील वाद मिटला. दोघे स्वतंत्र्यपणे जीवन जगण्यास मोकळे आहेत.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. हिंदु रितिरिवाजाप्रमाणे ५ जुलै २००५ साली दोघांचा विवाह झाला. सुरूवातील सुरळीत संसार सुरू होता. दोघांना एक मुलगाही झाला. तो आता ८ वर्षाचा आहे. काही कालावधीनंतर दोघात वैचारिक मतभेद निर्माण झाले. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. तो अर्ज अॉगस्ट २०२१ मध्ये मंजुर झाला. निकालानुसार मुलाचा आईकडे ताबा असणार आहे.
आई मुलाला वडिलांना भेटूही देत होती. मात्र, स्वभावातील तफावतीमुळे दोघात पुन्हा वाद निर्माण झाला. वडिलांची व्यसनाधीनता आणि सांभाळण्यास असमर्थ असल्यामुळे आईने वडिलांना मुलाला भेटू देण्याचे टाळले. त्यामुळे वडिलांनी अॅड. अतुल गुंड पाटील यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली. मुलास भेटण्यास परवानगी देण्याची मागणी केली. तर आईच्या वतीन अॅड. सचिनकुमार गेलडा यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. अमोल भोसले यांनी सहकार्य केले.
आईने वडील व्यसनाधीन असल्याने मुलाला भेटू देत नसल्याचे सांगितले. हा दावा लोक अदालतमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आला. त्यामध्ये यशस्वी समुपदेशन झाले. वडिलांनी मुलाला भेण्याच्या मागणीवरून माघार घेतली. दावा निकाली निघाला.
“घटस्फोटानंतर मुलाला भेटण्यावरून आई-वडिलांमध्ये वाद होते. हे वाद पुन्हा न्यायालयात पोहोचले. मात्र, समुपदेशनानंतर वडिलांनी मुलाला भेटण्याच्या मागणीवरून माघार घेतली. वाद मिटले.” अॅड. सचिनकुमार गेलडा, (पत्नीचे वकील)





