जनसुरक्षा की ‘भाजप सुरक्षा विधेयक’? उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनसुरक्षा विधेयकावर जोरदार टीका केली आहे. या विधेयकाला ‘भाजप सुरक्षा विधेयक’ अशी संज्ञा देत त्यांनी सरकारच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ठाकरे म्हणाले, “नक्षलवाद संपत आलाय, मग हा कायदा कोणासाठी? यात नक्षलवादाचा उल्लेखही नाही. हे विधेयक राजकीय दुरुपयोगासाठी आणलं जात आहे.” त्यांनी या कायद्याची तुलना मिसा आणि टाडा कायद्यांशी केली, ज्याचा गैरवापर झाल्याचा इतिहास आहे.
ठाकरे यांनी विधेयकातील अस्पष्ट तरतुदींवर बोट ठेवत म्हटले की, ‘बेकायदा कृत्य’ याची स्पष्ट व्याख्या नसल्याने विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. “कडव्या डाव्या विचारसरणीचा उल्लेख आहे, पण त्याचा अर्थ काय? जो कोणी भाजपविरोधात बोलेल, त्याला देशद्रोही ठरवलं जाईल का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ठाकरे यांनी विधेयकाला ‘शेंडा-बुडका नसलेलं’ संबोधत सरकारवर बहुमताच्या जोरावर कायदा लादण्याचा आरोप केला.
“देशविघातक शक्तींचा बिमोड करण्यासाठी आम्ही सरकारसोबत आहोत, पण राजकीय हेतूने कायदा आणू नका,” असे ठाकरे म्हणाले. त्यांनी चेतावणी दिली की, या कायद्यामुळे कोणालाही कधीही ताब्यात घेतलं जाऊ शकतं, ज्यामुळे लोकांचा रस्त्यावर उतरण्याचा अधिकार धोक्यात येईल. ठाकरे यांच्या टीकेने विधेयकावरून राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत काल गुरूवारी बहुमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. संविधान विरोधी माओवादी चळवळ, नक्षलवाद्यांना प्रतिबंध करण्यासाठी हे विधेयक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हे विधेयक चर्चेअंती सभागृहाने बहुमताने मंजूर केले.




