उद्योगपती करण दीप सिंग कोण आहेत? ईडीच्या रडारवर का आले, 127 कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली: प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) अल्केमिस्ट ग्रुपच्या प्रवर्तकांविरुद्ध मोठी कारवाई करत त्यांच्या 127 कोटी रुपये किमतीच्या अचल मालमत्तेवर जप्ती आणली आहे. या प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार आणि प्रसिद्ध उद्योगपती कंवर दीप सिंह यांचे पुत्र करण दीप सिंह यांच्यावर फसवणूक आणि सार्वजनिक पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल पोलिसांनी यापूर्वीच याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आता ईडीने या प्रकरणाची चौकशी हाती घेतली आहे.
काय आहे प्रकरण?
अल्केमिस्ट ग्रुपवर गुंतवणूकदारांना व्हिला, प्लॉट, फ्लॅट आणि उच्च परताव्याच्या आमिषाने पैसे उकळून फसवणूक केल्याचा आरोप आहे. या ग्रुपने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक गुंतवणूक योजना राबवल्या आणि नंतर त्यांच्याशी फसवणूक केली. अल्केमिस्ट होल्डिंग्स लिमिटेड आणि अल्केमिस्ट टाउनशिप इंडिया लिमिटेड यांनी अवैधरित्या सुमारे 1,848 कोटी रुपये जमा केले. या पैशांचा गैरमार्गाने वापर करण्यात आला.
ईडीच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. गुंतवणूकदारांचे पैसे अल्केमिस्ट ग्रुपच्या विविध संस्थांशी संबंधित व्यवसायात गुंतवले गेले. काळा पैसा पांढरा करण्यासाठी या पैशांचा वापर करण्यात आला. या पैशांतूनच अल्केमिस्ट हॉस्पिटल आणि ओजस हॉस्पिटल उभारण्यात आले. तसेच, करण दीप सिंह यांच्या मालकीच्या सोरस एग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेडमध्ये या पैशांतून 37.24 टक्के शेअर्स खरेदी करण्यात आले.
कंवर दीप सिंह कसे अडकले?
ईडीने 2016 मध्ये कंवर दीप सिंह यांच्या ‘अल्केमिस्ट इन्फ्रा रिअॅल्टी लिमिटेड’ कंपनीविरुद्ध तपास सुरू केला होता. सेबीच्या (सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) तक्रारीवरून या प्रकरणाची दखल घेण्यात आली. तपासात अनेक अनियमितता आढळल्यानंतर ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत गुन्हा दाखल केला. जानेवारी 2021 मध्ये कंवर दीप सिंह यांना अटक करण्यात आली. 2015 पूर्वी अवैध गुंतवणूक योजनेद्वारे कोट्यवधी रुपये उकळल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
अनेक राज्यांत फसवणुकीचे बळीअल्केमिस्ट ग्रुपच्या फसवणुकीमुळे देशातील अनेक राज्यांतील लोक बळी ठरले. हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधून अनेक प्रकरणे समोर आली. तपासात असेही उघड झाले की, हरियाणातील पंचकुला येथील पार्श्वनाथ रॉयल प्रकल्पात अल्केमिस्ट रिअॅल्टी लिमिटेडचा वाटा आहे. यात सुमारे 18 फ्लॅट अल्केमिस्ट ग्रुपच्या मालकीचे आहेत. तसेच, सिरमौर येथील क्योंथलमध्ये 250 बीघ्यांहून अधिक जमीन या ग्रुपशी संबंधित आहे. ईडीने या सर्व मालमत्तांवर जप्ती आणली आहे.
दरम्यान, ईडीच्या तपासात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांचा विश्वासघात आणि पैशांचा गैरवापर यामुळे अल्केमिस्ट ग्रुप आणि त्यांचे प्रवर्तक कायदेशीर कचाट्यात सापडले आहेत. या प्रकरणात पुढील कारवाई आणि तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





