मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या तुलनेत प्रियंका गांधी या उत्तम पर्याय-सलमान खुर्शीद

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक महत्वाचं विधान केले आहे. खुर्शीद यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या तुलनेत प्रियंका गांधी या उत्तम पर्याय असल्याचे मोठे वक्तव्य केले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. “भविष्यामध्ये निवडणूक कोण जिंकणार हे निश्चित होईलच. मात्र प्रियंका गांधी या योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा उत्तम पर्याय आहेत आणि हेच वास्तव आहे” असे सलमान खुर्शीद म्हणाले आहेत. तसेच भाजपा सरकारने अनेकांविरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या खोट्या तक्रारी मागे घेण्याचा आम्ही प्रयत्न करू असेही म्हटले आहे.
सलमान खुर्शीद यांनी लखनौमध्ये निवडणूक जाहीरनाम्यासंदर्भात विभागीय स्तरावरील बैठकीनंतर आपले मत नोंदवले. “प्रियंका गांधी लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि लोकांना आश्वासन देत आहेत की उत्तर प्रदेश एक उत्तम आणि पारदर्शक सरकारची स्थापना केली जाणार आहे” असे खुर्शीद यांनी म्हटले आहे.
तसेच त्यांना प्रियंका गांधी योगी आदित्यनाथ यांना टक्कर देऊ शकतात का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “भविष्यामध्ये दिसून येईलच की कोण निवडणूक जिंकणार आहे. प्रियंका गांधींचा चेहरा हा त्यांच्यापेक्षा (योगींपेक्षा) फार उत्तम आहे आणि हेच सत्य आहे” असे सांगितले आहे.
काँग्रेसच्या जाहिरनाम्यासंदर्भात निर्णय घेणाऱ्या समितीचे सदस्य असणाऱ्या खुर्शीद यांनी काँग्रेस दिवाळीनंतर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा जाहीनामा घोषित करणार असल्याचे म्हटले आहे. “आम्ही विभागीय स्तरावर बैठकी सुरू केल्या आहेत. रविवारी अशीच एक बैठक लखनौमध्ये झाली. करोना कालावधीमध्ये आम्ही अनेकांसोबत तज्ज्ञांसोबत ऑनलाईन माध्यमातून बैठकी घेतल्या आहेत. परिस्थिती सध्या सुधारली आहे तर आम्ही प्रत्यक्षात लोकांच्या बैठकी घेत आहोत. त्यांच्या अडचणी ऐकून त्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय. जाहीरनामा हे आमचं धोरण आहे. जेव्हा लोक हा जाहीरनामा पाहतील तेव्हा त्यांना हे जाहीरनामा आपल्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करतोय असे वाटले पाहिजे” असे खुर्शीद यांनी म्हटले आहे.
खुर्शीद यांनी काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात येतील असंही सांगितलं. “भाजपा सरकारने अनेकांविरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या खोट्या तक्रारी मागे घेण्याचा आम्ही प्रयत्न करू जेथे कायद्याचा दुरुपयोग करण्यात आला आहे. मग हे गुन्हे चकमकीचे असो किंवा बेकायदेशीरपद्धतीने घरं पाडण्याचे असो किंवा अटकेसंदर्भातील असो आम्ही न्याय देण्यासाठी प्रयत्न करू” असे देखील खुर्शीद यांनी म्हटले आहे.





