पुण्यातील ‘दिनानाथ’च्या घटनेची पुनरावृत्ती? कल्याणमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू

मुंबई : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता ठाणे जिल्ह्यातील केडीएमसी पालिका रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी आलेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शांतीदेवी अखिलेश मौर्य (वय-३०) असे या मृत महिलेचे नाव आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप मृत महिलेच्या पतीसह कुटुंबीयांनी केला आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खडेगोळवली परिसरात राहणारी शांतीदेवी मौर्य दोन महिन्यांची गर्भवती होती. तिला तीन मुले असल्याने पतीने गर्भपात आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शक्तीधाम प्रसूतिगृहात दाखल केले होते. सोमवारी तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र, त्यापूर्वीच तिची प्रकृती खालावल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याचदरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिचा पती अखिलेश मौर्य यांनी आपल्या पत्नीच्या मृत्यूस प्रसूतिगृहातील डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
डॉक्टरांनी आरोप फेटाळले
अखिलेश मौर्य म्हणाले की, पत्नीला किडनी स्टोनचा त्रास असल्याने एका आशा वर्करने त्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले होते. मात्र, आता ती गुटखा खात असल्याने तिचा मृत्यू झाला, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. डॉ. गणेश डोईफोडे यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत.
शांतीदेवी मौर्य हिचा गर्भपात आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करायची होती. तिला रक्त कमी असल्याने ते देण्यात आले. इंजेक्शनही दिले गेले. शस्त्रक्रियागृहात दुपारी आणले असता, तिची प्रकृती खालावली. त्यामुळे पुढील उपचारांसाठी रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. या प्रसूतिगृहात अतिदक्षता विभाग असल्याचे डॉक्टरांनीही मान्य केले.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेमकं काय घडलं?
तनिषा भिसे या गर्भवती महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्याने २९ मार्च २०२५ रोजी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तनिषा या भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या. कुटुंबीयांचा आरोप आहे की, रुग्णालयाने उपचार सुरू करण्यापूर्वी १० लाख रुपयांची मागणी केली. कुटुंबाने ३ लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली, तरीही रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिला. यामुळे तनिषाला दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले, जिथे तिने जुळ्या मुलींना जन्म दिला, परंतु उपचारातील विलंबामुळे तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी रुग्णालयाबाहेर आंदोलने केली, तर सोशल मीडियावरही तीव्र नाराजी व्यक्त झाली. सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी केली असून, अहवालात रुग्णालयाच्या चुकीमुळे मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. आता डॉ. घैसास यांच्या राजीनाम्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





