Prataprao Jadhav: पावसाने ओढ दिली, पिकांनी टाकल्या माना ; प्रतापराव जाधव थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
Prataprao Jadhav:

Prataprao Jadhav: पावसाने गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून दडी मारल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतातील पिके सुकू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री त्यासोबतच बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत “खचून जाऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे,” अशी ग्वाही दिली.
यंदा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला उशिरा सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि सुरुवातीला पिकांची वाढही चांगली झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांवर पाण्याअभावी संकट ओढवले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात यंदा सुमारे 3 लाख 47 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. सोयाबीनचे पीक फुलोऱ्यात येऊन शेंगा लागण्याच्या तयारीत असतानाच पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पावसाअभावी सुमारे 40 टक्के सोयाबीन पिकांचे नुकसान होण्याची शक्यता, तर उत्पादनात सुमारे 50 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रतापराव जाधव यांनी खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा, अटाळी, शहापूर, आडगाव, बोरी आणि शिर्ला नेमाने या गावांना भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. पिकांची सद्यस्थिती, पावसाअभावी झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांच्या अडचणी याबाबत त्यांनी माहिती घेतली.
“पाऊस नाही, ही निसर्गाची अकृपा आहे. त्यावर आपले नियंत्रण नाही. मात्र, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. सरकार त्यांच्या पाठीशी आहे,” असा विश्वास जाधव यांनी शेतकऱ्यांना दिला.
दरम्यान, पावसाअभावी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.






