Prashant Kishor : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे सरकार येईल. त्यानंतर बिहारची सूत्रे दिल्ली आणि गुजरातकडे जातील, अशी उपरोधिक टिप्पणी जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी केली. त्यातून त्यांनी बिहारमधील नव्या सरकारचे नियंत्रण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे जाणार असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले. नितीश राज्यसभा सदस्य बनण्यास सज्ज झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपद सोडून ते राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या घडामोडींशी संबंधित प्रश्न शनिवारी पत्रकारांनी जहानाबादमध्ये किशोर यांना विचारले. एनडीएने बिहारची सत्ता राखली तरी नितीश मुख्यमंत्री बनणार नाहीत, असे मी निवडणूक काळात म्हणत होतो. प्रारंभी माझे भाकीत खोटे ठरल्याचे वाटत असेल. मात्र, माझ्या भाकितानंतर चार महिन्यांतच नितीश पायउतार होण्याच्या स्थितीत आहेत. आता बिहारमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार येईल. त्याचे नियंत्रण दिल्लीत बसलेल्या गुजरातींकडे असेल. त्यामुळे नवे सरकार बिहारच्या हितासाठी कार्य करण्याविषयी साशंकता वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केवळ मतप्राप्तीसाठी बिहारमध्ये आले. त्यांची खेळी न समजल्याची केलेली चूक आता बिहारी जनतेच्या ध्यानात येईल, असे ते म्हणाले.