Prakash Ambedkar : “…म्हणून मुस्लिम मतदारांनी आता काँग्रेस सोबत जाऊ नये” ; प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक वक्तव्य

Prakash Ambedkar : राज्यात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहताना दिसून येत आहे. सर्व पक्ष निवडुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक झाली, त्यात वंचितविषयी कोणत्याही पक्षाने सकारात्मकता दाखवली नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला वंचितला रीतसर निमंत्रण धाडण्यात आले. पण त्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात मुस्लिम संवाद सभेमध्ये बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी, “आपल्याला काँग्रेसने हे दिलं ते दिलं म्हणून मुस्लिम मतदारांनी आता काँग्रेस सोबत जाऊ नये. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी अर्ध्या जागांवर काँग्रेस एकटी लढली तर अर्ध्याहून अधिक ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जप्त होईल. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे मात्र यांच्यात जागा वाटपावरून अद्याप एकमत होताना दिसत नाही’, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
जर येत्या 15 दिवसात यांनी जागा वाटपाचा निर्णय घेतला तर हे वाचतील. नाही तर यांचे ही हाल इंडिया आघाडीसारखे होतील असे वक्तव्य आंबेडकर यांनी केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात इंडीया आघाडी तयार झाली होती. मात्र ती जेव्हा बनली तेव्हाच हे निश्चित होतं की ही तुटणार आहे, कारण याचा रिंग मास्टर पंतप्रधान नरेंद मोदी होते, असा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला.





