पिंपरी – संचारबंदीमध्ये नागरिकांना रस्त्यावर फिरण्यास मनाई आहे. मात्र मॉर्निंग वॉक, कुत्रा फिरविण्यासाठी तसेच मास्क न वापरणाऱ्या दहा जणांवर शुक्रवारी (दि. १७) निगडी पोलिसांनी कारवाई केली.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ३ मे पर्यंत लॉक डाऊन घोषित केले आहे. तसेच नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली असून संचारबंदीचा आदेश लागू केला आहे. असे असतानाही भाजी, किराणा, औषध आणण्याच्या नावाखाली दिवसभर नागरिकांचा रस्त्यावर राबता असतो. शुक्रवारी सकाळी निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मॉर्निंग वॉक, कुत्रा फिरवणे तसेच मास्क न वापरता घराबाहेर पडलेल्या दहा जणांवर निगडी पोलिसांनी कारवाई केली.
नियम मोडणाऱ्या या नागरिकांच्या हातात करोना विषयक मजकूर असलेला फलक देऊन त्यांना जनजागृती करण्यास भाग पाडले. निगडी पोलिसांच्या या कारवाईमुळे विनाकारण मोकाट फिरणाऱ्या शहरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.