PMC News: महापालिकेत पाण्याचे हांडे फुटले! विरोधक आक्रमक, सत्ताधाऱ्यांचं ‘ते’ विधान ऐकून सभागृहात प्रचंड गदारोळ
PMC News: दिवसाआड पाणीपुरवठ्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ; नियोजन कोलमडल्याचा आरोप करत विरोधकांचे हांडे आंदोलन.

PMC News – शहरातील दिवसाआड पाणीपुरवठा निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर उद्भवलेल्या अडचणींवरून बुधवारी (दि. १७) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. नियोजन कोलमडल्याचा आरोप करत विरोधकांनी प्रशासनावर टीका केली, तर नागरिकांच्या अडचणी गंभीर असल्या, तरी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये दोषारोपांचे राजकारण करू नये, अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी मांडली.
सभा सुरू होताच पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आणि त्यांनी पाण्याचे हांडे घेऊन सभागृहात आंदोलन केले. त्यावर सभागृहात चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी दिले. विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम यांनी पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याचा आरोप करत, पुणेकरांना वेळेवर पाणी कसे देणार, असा सवाल उपस्थित केला. नगरसेवक निवृत्ती बांदल यांनी अनेक भागांत पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्यांमध्ये सांडपाणी मिसळत असल्याबद्दल संताप व्यक्त केला.
नागरिकांचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी मान्य केले. मात्र, दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करताना काही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात, असे सांगत प्रशासनाच्या सर्वच अधिकाऱ्यांना दोषी ठरविणे योग्य नसल्याचे नमूद केले. धरणांमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याचे सांगताना त्यांनी, या कठीण काळात नागरिकांचे फोन न उचलणाऱ्या किंवा फोन बंद ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.
तसे अशा वेळी सर्वांनी हाताहात घालून काम करावे, असे आवाहन केले. धरणात पाणी नसेल, तर प्रशासन काय जादूगार नाही, असेही ते म्हणाले. यावर प्रशासनातील चुकीच्या कामांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका घेत नागरिकांना उत्तरदायित्व अपेक्षित असल्याचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी सांगितले. त्यावर चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे बिडकर यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर अतुल तरवडे, अजित घुले, प्रशांत जगताप, अनिता इंगळे, ऍड,. चंदू कदम, अनिल सातव, प्रतीक कदम, रुपाली पवार, सुरेखा कवडे, सुभाष नाणेकर, गफूर पठाण आदींनी आपापल्या प्रभागातील पाण्याचे प्रश्न मांडले. तातडीच्या उपाययोजनांसह दीर्घकालीन पाणी नियोजनाची आवश्यकता असल्यावर सर्वच सदस्यांनी भर दिला.




