PMC News : मुठा उजवा कालव्याच्या बांधामधून पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी टाकण्यासाठी जलसंपदा विभाग जागा भाडेपट्ट्याने घेण्याच्या प्रस्तावाला पालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या बदल्यात पालिकेला १० कोटी ३७ लाखांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १००० मिमी व ५०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्या स्वारगेट ते जवाहरलाल नेहरू रस्त्यापर्यंत टाकण्याचे नियोजन आहे. यासाठी जलसंपदा विभागाच्या मालकीची जागा वापरणे आवश्यक असल्याने भाडेपट्टा देण्यास शासनस्तरावर मान्यता देण्यात आली आहे. पालिकेकडून ही जलवाहिनी कालव्याच्या शेजारून टाकण्यात येणार होती. मात्र, या मार्गावर आधीच पावसाळी जलवाहिन्या, ड्रेनेज लाईन, मेट्रो, उड्डाणपूल तसेच इतर पायाभूत सुविधा अस्तित्वात आहेत. त्यामुळे नव्याने जलवाहिनी टाकताना तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. तसेच काही ठिकाणी नाला क्रॉसिंगच्या ठिकाणी काम अधिक गुंतागुंतीचे होण्याची शक्यता होती. त्यामुळे रस्ता खोदकाम टाळण्यासाठी कालव्याच्या बांधामधून जलवाहिनी टाकण्याचा पर्याय निवडला आहे. जलवाहिनी प्रकल्प ( संग्रहित फोटो ) काय होता वाद पालिकेकडून पर्वती जलकेंद्र ते मित्रमंडळ चौकातून पुढे पंडीत नेहरू रस्त्या पर्यंत सुमारे अडीच किलोमीटरची नवीन १००० मिमी व ५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने वर्षभरापूर्वी जलसंपदा विभागाकडे कामाला मान्यता देण्याची मागणी केली होती. मात्र, जलसंपदा विभागाने पालिकेकडे जागेच्या भाड्यापोटी एकवट निधी म्हणून तब्बल १०.३७ कोटी रुपयांच्या शुल्काची मागणी केली होती. कालव्यालगतचा रस्ता काँक्रिटीकरण करण्याचा हट्ट धरला होता. महापालिकेकडून केली जाणारी कामे नागरिकांसाठीची असल्याने तसेच पालिकेस जलवाहीनी टाकण्यासाठी इतर कोणताही शासकीय विभाग शुल्काची मागणी करत नसल्याने हे शुल्क देण्यास नकार दर्शविला होता. मात्र, पाण्याची वाढती टंचाई लक्षात घेत पालिकेने अखेर एक पाऊल मागे घेतले आहे. काय होणार फायदा ही जलवाहिनी टाकल्यास शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, गंज पेठ, बुधवार पेठ, नाना पेठ, काशेवाडी, भवानी पेठ, रविवार पेठेसह या परिसरातील सहा ते साडेसहा लाख नागरिकांना दररोज तब्बल ८० एमएलडी पाणी दिले जाणार आहे. या भागातील कमी दाबाने पाणी येणे, तसेच पाणी कमी येण्याची समस्या कायमची दूर होणार आहे. सध्या या भागात जुन्या जलवाहिन्यांमधून पाणी दिले जाते. त्या वारंवार फुटत असून त्यांना मोठया प्रमाणात गळतीही आहे. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. ही बाब लक्षात घेवून या नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत.