PMC News – शहरात जानेवारी महिन्यात झालेल्या पुणे ग्रँड टूर या सायकल स्पर्धेसाठी महापालिकेकडून पंधरा दिवसांत शहरातील रस्त्यांवरील तब्बल दोन हजार चेंबर समपातळीत आणली होती. मात्र, त्यानंतर आता तीन महिन्यांत शहरात अवघे १२८३ चेंबर रस्त्याच्या समपताळीवर आणण्याचे काम पूर्ण झाले आहे. महापालिकेने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्ते खड्डेमुक्त अभियान हाती घेतले असून, १५ डिसेंबर २०२५ पासून चेंबर्स समपातळीवर आणण्याचे काम सुरू आहे. यासाठी झोननिहाय निविदा न काढता थेट ठेकेदारांना कामे देण्यात आली असली, तरी सायकल स्पर्धेनंतर हे काम संथगतीने सुरू असल्याने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीच शुक्रवारच्या आढावा बैठकीत याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. बैठकीस अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता (विद्युत) मनीषा शेकटकर, मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर, अधीक्षक अभियंता अशित जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या काम केवळ स्पर्धेपुरते मर्यादित राहिल्याने शहरातील इतर भागांत अद्याप अनेक ठिकाणी चेंबर्स खाली राहिले आहेत. परिणामी वाहनांचे अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दररोजच्या कामाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर केला जात आहे. त्यातून ही बाब समोर आली आहे. प्रशासनाकडून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रात्री कामे केली जात असली, तरी कटर व ब्रेकरमुळे होणाऱ्या आवाजामुळे नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे आवश्यक दक्षता घेत, शक्य त्या ठिकाणीच कामे केली जात असल्याने उशीर होत असल्याचे प्रशासनाने या वेळी सांगितले. मात्र, डांबरीकरणानंतर खाली गेलेल्या चेंबर्समुळे निर्माण होणारे खड्डे आणि त्यातून होणारे अपघात टाळण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे. आयुक्तांनी कामाला अधिक गती देत दररोज जास्तीत जास्त चेंबर समपातळीवर आणण्याचे आदेश दिले आहेत.