PMC News : महापालिकेचा मोठा निर्णय! नोकरभरती आदेशांवर आता असणार ‘क्यूआर कोड’; बनावटगिरीला बसणार चाप
PMC News : महापालिकेत चतुर्थ श्रेणीतील नोकऱ्यांचे आमिष दाखवून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीला रोखण्यासाठी प्रशासनाचे पाऊल.

PMC News – बनावट आदेशाद्वार नोकरी लावून देण्याच्या आमिषाने होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांना आता महापालिकेकडून आळा घातला जाणार आहे. यापुढे महापालिकेच्या कंत्राटी, तसेच कायमस्वरूपी नोकरभरतीसंदर्भातील प्रत्येक आदेशावर ‘क्यूआर कोड’ देण्यात येणार असून, नागरिकांना त्या कोडच्या माध्यमातून आदेशाची सत्यता तपासता येणार आहे.
येत्या ५ जूनपासून या नव्या प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजीत नायर यांनी दिली. गेल्या काही दिवसांत सोशल मीडिया, तसेच पोलिसांकडे दाखल झालेल्या काही तक्रारींची गांभीर्याने दखल घेत कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला असल्याचे नायर म्हणाले.
महापालिकेत कायम कर्मचाऱ्यांपेक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने विशेषतः चतुर्थ श्रेणीतील नोकऱ्यांचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. दोन वर्षांपूर्वी अशाच फसवणुकीमुळे एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणाच्या तपासादरम्यान जिल्हा पोलिसांनी महापालिकेकडे काही मुद्द्यांवर खुलासा मागविला होता.
त्या वेळी २०१४ पासून महापालिकेत सरळसेवेची भरती बंद असल्याचे, तसेच बनावट नियुक्तीपत्रात आयुक्तपदाचे नावही चुकीचे नमूद केल्याचे प्रशासनाने निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे संबंधित नियुक्तीपत्र पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले होते. आत्महत्या केलेल्या युवकाच्या व्हॉट्सअॅपमध्ये १३ जणांची नावे आढळली असून, त्यामध्ये महापालिकेचा कोणताही कर्मचारी सहभागी असल्यास त्याची माहिती पोलिसांना दिली जाईल, असेही नायर यांनी सांगितले.
तक्रारींकडे मात्र दुर्लक्ष
एका तरुणाच्या आत्महत्येच्या प्रकरणानंतर पोलिसांनी पालिकेकडे विचारणा केल्यानंतर महापालिकेला बनावट भरतीप्रकरणी जाग आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षासह, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही सामान्य प्रशासन विभाग, तसेच शिक्षण मंडळातील काही कर्मचाऱ्यांच्या नावासह तक्रार केली असून, त्याबाबत मात्र प्रशासनाने कार्यवाही केली नसल्याचे समोर आले आहे.
याबाबत विचारणा केली असता, सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे यांनी आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे अशा गंभीर घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.






