PM Modi Letter: माझ्या प्रिय देशवासियांनो… जीएसटी सुधारणा लागू झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशाच्या नावे लिहिले पत्र

PM Modi Letter: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना उद्देशून पत्र लिहिले आहे. यात त्यांनी नवरात्रीच्या शुभेच्छा देताना ‘जीएसटी बचत उत्सव’ सुरू झाल्याची घोषणा केली आहे. नव्या जीएसटी सुधारणांमुळे शेतकरी, महिला, युवा, गरीब, मध्यमवर्गीय, व्यापारी आणि लघुउद्योजकांना फायदा होणार असून, दैनंदिन गरजेच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. या सुधारणांमुळे सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
आइए, ‘GST बचत उत्सव’ के साथ त्योहारों के इस मौसम को नई उमंग और नए जोश से भर दें! GST की नई दरों का मतलब है- हर घर के लिए अधिक से अधिक बचत, साथ ही व्यापार और कारोबार के लिए बड़ी राहत। pic.twitter.com/hFHkMTF8G7
— Narendra Modi (@narendramodi) September 22, 2025
पंतप्रधानांचा संदेश: जीएसटी सुधारणांचा नवा अध्याय –
पंतप्रधानांनी पत्रात लिहिले, “माझ्या प्रिय देशवासीयांनो, नमस्कार! आपणा सर्वांना आणि आपल्या कुटुंबियांना शक्तीच्या उपासनेचं पर्व असलेल्या नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! हा सण आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी घेऊन येवो, अशी माझी प्रार्थना आहे. यंदाच्या सणासुदीला आणखी एक भेट मिळाली आहे. २२ सप्टेंबरपासून ‘नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स’ लागू झाले असून, देशभरात ‘जीएसटी बचत उत्सव’ सुरू झाला आहे.
या सुधारणांमुळे जीएसटीचे फक्त दोन स्लॅब ठेवण्यात आले आहेत. रोजच्या गरजेच्या वस्तू जसे की अन्न, औषधे, साबण, टूथपेस्ट आता करमुक्त किंवा ५% च्या सर्वात कमी स्लॅबमध्ये असतील. घर बांधणे, वाहन खरेदी, बाहेर जेवणे किंवा कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेणे आता अधिक सुलभ होईल. तसेच, आरोग्य विम्यावरील जीएसटी पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. काही दुकानदार आणि व्यापारी ‘आधी आणि आता’ असे फलक लावून ग्राहकांना वस्तू किती स्वस्त झाल्या हे सांगत आहेत, हे पाहून मला आनंद होत आहे.
२०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्याने करांचा गुंता संपला आणि ग्राहक, व्यापारी, उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला. आता नव्या जीएसटी सुधारणांनी ही प्रक्रिया आणखी सुलभ केली आहे. यामुळे लघुउद्योग आणि दुकानदारांना अधिक सुलभता मिळेल. गेल्या ११ वर्षांत आमच्या प्रयत्नांमुळे २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले. देशात एक नवीन मध्यमवर्ग उदयास आला आहे. आता या वर्गाला आणखी सशक्त करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.
१२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही प्राप्तिकर आकारला जात नाही. नव्या जीएसटी सुधारणांमुळे आणि प्राप्तिकर सवलतीमुळे देशवासीयांचे सुमारे २.५ लाख कोटी रुपये वाचतील. २०४७ पर्यंत विकसित भारताच्या संकल्पासाठी आत्मनिर्भरता आवश्यक आहे. नव्या जीएसटी सुधारणांमुळे आत्मनिर्भर भारत मोहिमेला गती मिळेल.
कोणताही ब्रँड किंवा कंपनी असो, जर त्यात भारतीय कामगार आणि कारागिरांची मेहनत असेल, तर तो स्वदेशी आहे. स्वदेशी वस्तू खरेदी करून आपण अनेक कुटुंबांना रोजगार आणि देशातील युवकांना संधी देतात. व्यापाऱ्यांना स्वदेशी वस्तूंची विक्री करण्याचे आवाहन केले आहे. गर्वाने सांगा, हे स्वदेशी आहे!.
पंतप्रधानांनी पत्राचा समारोप करताना लिहिले, “आपल्या घरातील बचत वाढावी, आपली स्वप्ने पूर्ण व्हावीत आणि आपण पसंतीच्या वस्तूंमुळे सणासुदीची चमक वाढवावी, हीच माझी इच्छा आहे. पुन्हा एकदा, नवरात्रीच्या आणि ‘जीएसटी बचत उत्सव’च्या हार्दिक शुभेच्छा!” या पत्राने देशवासीयांना सणासुदीच्या उत्साहासोबत आर्थिक सुधारणांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.


