Pimpri News | सहल केंद्रात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट! चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ; जाॅगिंगसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही भीती

प्रभात वृत्तसेवा
भोसरी – भोसरी परिसरातील सहल केंद्र या लोकप्रिय उद्यानामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यामुळे येथील नागरिक, विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. सकाळी व संध्याकाळी व्यायामासाठी, फिरण्यासाठी किंवा लहान मुलांना खेळवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक या उद्यानात येत असतात. मात्र आता उद्यानामध्ये कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सहल केंद्रामध्ये विविध खेळणी, झुले, स्लाईड्स बसवण्यात आले आहेत. लहान मुलं यात दिवसभर खेळताना दिसतात. पण मोकाट कुत्र्यांचा वाढता वावर पाहता कोणत्याही क्षणी एखाद्या मुलावर हल्ला होण्याची भीती पालकांना सतावत आहे. लहान मुले सहज घाबरतात आणि कुत्र्यांना चिडवण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता अधिक आहे. गेल्या आठवड्यात दोन मुलांचा कुत्र्यांनी पिच्छा पुरविल्याची घटना नागरिकांनी सांगितली.
सकाळी चालण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांनी सांगितले की, मोकाट कुत्रे झुंडीने धावत सुटतात. धावणाऱ्यांच्या मागे लागतात, काही वेळा भुंकून नागरिकांना घाबरवतात. त्यामुळे जॉगिंग, सायकलिंग किंवा साधं चालणंही धोकादायक होत आहे. एका ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले, “आम्ही रोज सकाळी चालायला येतो. पण आता कुत्र्यांची भीती वाटते. त्यांच्या हल्ल्याने पडून इजा होण्याची शक्यता जास्त आहे.”
या कुत्र्यांचे लसीकरण झालेले आहे का याबाबतही शंका आहे. तसेच कुत्र्यांमुळे बागेमध्ये अस्वच्छता पसरते. गवतामध्ये त्यांचे विष्ठा पडल्यामुळे दुर्गंधी पसरते. लहान मुले त्यामध्ये खेळताना संपर्कात येऊ शकतात, ज्यामुळे आरोग्य धोक्यात येते.
पालिकेची निष्क्रियता..
नागरिकांनी वारंवार पालिकेकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. मोकाट कुत्रे पकडण्यासाठी स्वतंत्र पथक असले तरी त्यांची गती फारच मंद आहे. एका दिवसात दोन-चार कुत्रे पकडले जातात, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांची संख्या वाढते. त्यामुळे ही समस्या कायम राहते.
नागरिकांची मागणी..
सहल केंद्र व परिसरात राहणाऱ्या कुत्र्यांना तातडीने पकडून अन्य ठिकाणी हलवावे. सर्व मोकाट कुत्र्यांचे लसीकरण त्वरित करावे. उद्यानामध्ये स्वतंत्र सुरक्षा रक्षक नेमावा, जेणेकरून नागरिक निर्धास्तपणे फिरू शकतील, अशा मागण्या नागरिक करत आहेत.




