हिंजवडी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी आयटी परिसरात मेट्रोचे काम सुरू झाले आहे. तरी काही भागात अद्याप कॉलमसाठी खोदाई व कॉलम उभारणी न झाल्याने कामासाठी लावलेल्या बॅरिकेड्समुळे वाहतुकीचे तीन-तेरा वाजल्याचे चित्र आहे.
मेट्रोच्या कामासाठी रस्त्यावर दुतर्फा लावलेल्या बॅरिकेड्समुळे नेहमी वर्दळीचे ठिकाण असलेल्या आयटी उद्यानातील टी जक्शन, शिवाजी चौक ते मधूबन हॉटेल चौकापर्यंत ट्राफिक जाम होऊन वाहतूक कोंडी होत आहे. किंबहुना विप्रो सर्कल ते पद्मभूषण चौक, मेझा नाईन ते शिवाजी चौक, पंचरत्न चौक ते मधूबन हॉटेल या मुख्य रस्त्यांवरील चौकांत ठिक ठिकाणी लावण्यात आलेल्या मेट्रोच्या बॅरिकेड्सने मोठ्या प्रमाणात चक्का जाम होत आहे.
हिंजवडी आयटी पार्कची वाहतूक कोंडीची समस्या देशभरात विख्यात आहे. त्यामुळे अतिशय संथगतीने चाललेले हे काम कधी पूर्ण होणार असा सवाल आयटीयन्ससह स्थानिक हिंजवडीकर नागरिक उपस्थित करत आहेत. कारण बालेवाडी क्रीडासंकुल व वाकडच्या काही भागांत उशिरा काम सुरू होऊनही तिथे मेट्रोचे कॉलम तयार होऊन त्यावर पुलाचा सांगाडा जोडण्यात आला आहे. मात्र हिंजवडी परिसरात अनेक ठिकाणी हे काम अतिशय संथपणे सुरू असल्याने नागरिक मेट्रोच्या कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
या कामाला गती मिळावी म्हणून हिंजवडीचे सरपंच सचिन जांभुळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. मात्र, तब्बल महिना उलटूनही त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याने हिंजवडीकर हैराण झाले आहेत.
हिंजवडीतील मेट्रोच्या कामामध्ये काही ठिकाणी उच्चदाब वाहिनीचे अडथळे येत आहेत. एमआयडीसी हद्दीत या वाहिनीचे टॉवर बदलून त्याठिकाणी केबल टाकण्याचे काम सुरू असल्याने काम रखडले होते. परंतु जागेची उपलब्धता असेल अशा ठिकाणी काम अतिशय वेगात सुरू असून ठरलेल्या कालावधीत दर्जेदार काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– रिनाझ पठाण, अधीक्षक अभियंता मेट्रो.
मेट्रोचे काम कोविड काळापासून सुरू झाले आहे. त्यासाठी लावलेल्या बॅरिकेड्समुळे वाहतुकीची कोंडी नित्याने होत आहे. मेट्रोचे काम जलद गतीने व्हावे म्हणून हिंजवडी ग्रामपंचायतीने संबंधित विभागाकडे तसेच राज्यकर्त्यांकडे पत्रव्यवहार देखील केला आहे. मात्र तरीही शिवाजी चौक परिसरात काम संथपणे सुरू असल्याने वाहतुकीची गंभीर समस्या उद्भवत आहे. वाकड हद्दीत उशिरा काम सुरू होऊनही काम अंतिम टप्यात आले मग हिंजवडीतच विलंब का?
– सचिन जांभुळकर, सरपंच आयटीनगरी.
मेट्रोच्या नावाखाली रस्ता अडवून नागरिकांना विनाकारण वेठीस का धरले जाते. येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न ज्वलंत असतानाही अधिकारी जाणीवपूर्वक हे काम रेंगाळत ठेवत आहेत की काय असा प्रश्न पडतो.त्यामुळे मेट्रोने गांभीर्याने हिंजवडी हद्दीतील काम वेगाने करण्याची गरज आहे.
– श्रीकांत खवळे, आयटीतील प्रवासी.