Pimpri Chinchwad Accident – पिंपरी-चिंचवड शहरात अवजड वाहनांच्या बेफिकीर हालचालींनी मृत्यूचे थैमान घातले असून, शुक्रवारी झालेल्या दोन भीषण अपघातांत दोघांचा बळी गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या ४८ तासांत शहरात ५ जणांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. एकीकडे रक्ताने रस्ते माखत असताना दुसरीकडे वाहतूक पोलीस मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र दिसत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शुक्रवारी पहिली हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी १०.५६ च्या सुमारास पुणे-चाकण महामार्गावरील मोशी चौकात घडली. भोसरीकडून चाकणकडे जाणाऱ्या एका ट्रकच्या (एमएच १६ सीझेड ९७८७) डाव्या बाजूने जाणारा दुचाकीस्वार उजवीकडे वळण घेत असताना थेट ट्रकच्या चाकाखाली आला. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच अंत झाला. दुसरी घटना सकाळी १० वाजता शाहूनगर बीआरटी मार्गाजवळ घडली. चिखलीकडून केएसबी चौकाकडे जाणाऱ्या ट्रकने (एचआर ७३ बी ७३४०) एका स्प्लेंडर दुचाकीला धडक दिली. या अपघातात शिवरामा कृष्णन (वय ७६, रा. हरगुडे वस्ती, चिखली) यांच्या पायावरून ट्रक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान वायसीएम रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. पोलीस प्रशासन केवळ बघ्याची भूमिकेत? शहरात अवजड वाहनांना ठराविक वेळेत प्रवेश करण्यास बंदी असतानाही, मुख्य चौक आणि अंतर्गत रस्त्यांवर दिवसाढवळ्या हे ‘यमदूत’ वावरताना दिसत आहेत. गुरुवारी चिंचवडमध्ये झालेल्या अपघाताच्यावेळी मिक्सर ट्रक चालक मोबाइलवर बोलत असल्याचे दिसून आले. वाहतूक पोलिसांचे ‘दुर्लक्ष’ की ‘अर्थपूर्ण हितसंबंध’ यामुळेच हे निर्बंध केवळ कागदावरच राहिले आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे. गुरुवारीही ट्रॅक्टर पलटी होऊन आणि ट्रकच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला होता. सातत्याने होणारे हे मृत्यू रोखण्यात पोलीस दल पूर्णपणे अपयशी ठरत असल्याची भावना सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. नो-एन्ट्रीचे नियम धाब्यावर शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर अवजड वाहनांना ‘नो-एन्ट्री’चे फलक फक्त नावापुरतेच उरले आहेत. बीआरटी मार्ग असो वा वर्दळीचे चौक, अवजड वाहने आणि डंपर बिनदिक्कतपणे नियम पायदळी तुडवत आहेत. वाहतूक विभागाने वेळीच कठोर पावले उचलली नाहीत, तर शहराचे रस्ते ‘डेथ ट्रॅप’ बनण्यास वेळ लागणार नाही. या अपघातांबाबत संबंधित पोलीस ठाणी अधिक तपास करत आहेत, मात्र मृतांच्या कुटुंबांना न्याय कधी मिळणार, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. अपघात टाळण्यासाठी या आहेत उपाययोजना - अवजड वाहनांना दिवसा कडक बंदी. – अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई. - शहरात सीसीटीव्हीची प्रभावी देखरेख. - अनधिकृत प्रवेशावर दंडात्मक बडगा. - वाहतूक नियमांचे व्यापक जनजागरण. - ब्लॅक स्पॉटवर पोलीस नेमणूक. - रस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित हटवा.