पिंपरखेड पुन्हा हादरले! भरदुपारी बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय रोहनचा मृत्यू ; मृतदेह ताब्यात देण्यास ग्रामस्थांचा नकार

प्रभात वृत्तसेवा
जांबूत – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याची भीषण घटना घडली आहे. भरदिवसा ऊसाच्या शेताजवळ खेळत असलेल्या रोहन विलास बोंबे (वय 13) या मुलावर बिबट्याने झडप घालत त्याला शेतात ओढून नेले. या हल्ल्यात रोहनचा जागेवरच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने पिंपरखेड परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुमारे पावणेचारच्या सुमारास रोहन हा घरासमोरच्या शेताजवळ खेळत होता.
दरम्यान, ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला आणि ओढून नेले. मुलगा दिसत नसल्याचे लक्षात येताच कुटुंबीय आणि शेजारी शोध घेऊ लागले. तरुणांनी आरडाओरड करत ऊसाच्या शेतात प्रवेश केला असता, काही अंतरावर रोहनचा मृतदेह आढळून आला.दोन वेळा रास्तारोको आंदोलन करूनही वनविभाग झोपेत, आज अखेर ग्रामस्थांनी वाहन पेटवून संताप व्यक्त केला. ठोस कारवाई व सुरक्षिततेचे आश्वासन मिळाल्याशिवायरोहनचे शवविच्छेदन होऊ देणार नाही, असा पवित्रा पिंपरखेड ग्रामस्थांनी घेतला आहे.
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात संताप व्यक्त केला. घटनास्थळी दाखल झालेल्या वनविभागाच्या वाहनाची तोडफोड करून ते वाहन पेटवून दिले. ग्रामस्थांचा आरोप आहे की, मागील वीस दिवसांत या परिसरात बिबट्यांच्या हल्ल्याच्या तीन घटना घडल्या असून, तरीही विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. ग्रामस्थांचा रोष एवढा वाढला की, त्यांनी ठोस निर्णय घेतल्याशिवाय शवविच्छेदन होणार नाही असा इशारा दिला. संपूर्ण परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, पोलिस व प्रशासनाकडून ग्रामस्थांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तीन आठवड्यांत तिसरी घटना..
मागील काही दिवसांपासून पिंपरखेड परिसरात बिबट्यांचे वावर वाढल्याची भीती नागरिकांमध्ये आहे. गेल्या वीस दिवसांत झालेल्या या तिसर्या घटनेने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दोन वेळा रास्तारोको करूनही वनविभाग आणि शासन संवेदनाहीन राहिल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.





