PCMC News – शहरात ठिकठिकाणी पाण्याची गळती व नदीतून येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे अनेक भागातून दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पिण्याचे पाणी व नद्यांच्या पाण्याची तपासणी त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे २१ लाख रुपये खर्च होणार असून त्या त्रयस्थ संस्थेच्या लॅबकडून पाण्याची तपासणी केली जाईल. शहरातील पाणी समस्येवर ही तपासणी तोडगा ठरणार की अहवालांचे केवळ कागदी घोडे नाचविले जातील? असा प्रश्न उपस्िथत होत आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या जीवनदायिनी असणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांचे प्रदूषण वाढत आहे. नदीपात्रात सांडपाणी, अनेक कंपन्यांचे घातक रसायनयुक्त पाणी थेट सोडल्यामुळे नद्यांना गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नदीच्या विषारी पाण्यावर मृत मासे वारंवार तरंगताना दिसून येतात. शहरातील तीनही नद्या सर्वाधिक प्रदूषित असल्याचा निष्कर्ष प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दिला आहे. तसेच शहराला पाणी पुरवठा पवना आणि आंद्रा धरणातून होत आहे. पवनाचे पाणी रावेतमधून तर आंद्राचे पाणी निघोजे मधून उचलले जात आहे. त्यामुळे प्रदूषित पाणी हे शुध्द करत पिण्यायोग्य देण्याचे काम महापालिकेकडून केले जात आहे. इंद्रायणी नदी प्रदूषण त्यामुळेच महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने शहरातील पाण्याची व नद्यामधील पाण्याची तपासणी त्रयस्थ संस्थेकडून करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाकडे दोन निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यातील मे. मोनेरा लॅब या ठेकेदाराची २८ लाख ५४ हजार ५०० रुपये मधून रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग चार्जेस वगळून दिलेल्या किमंती पेक्षा २६.२० टक्के कमी दराने निविदा आलेली आहे. मे. मोनेरा लॅब या ठेकेदाराने तुलनात्मक वाजवी दराची निविदा सादर केल्याने महापालिकेच्या मानांकनाप्रमाणे काम मुदतीत पुर्ण करण्यास सक्षम असल्याने त्यास मुख्य अभियंत्याकडून मान्यता दिलेली आहे. वरील ठेकेदाराकडून २१ लाख ६ हजार ६२१ पर्यंत काम करुन घेण्यास आणि निविदा नियम, अटीप्रमाणे वस्तू व सेवा कर अदा करण्यास करारनामा करुन घेण्यास मान्यता देण्यासाठी स्थायी समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. महापालिका स्वतंत्र ठेवणार नोंदी महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पवना नदी, इंद्रायणी नदी, मुळा नदीचे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूंत पाण्याचे नमुने घेवून प्रदूषणाच्या नोंदी घेतल्या आहेत. त्यात शहरातील नद्यांचे आरोग्य बिघडले असल्याची माहिती समोर आली आहे. पवना नदी किवळेपासून ते दापोडीपर्यंत, इंद्रायणी नदी तळवडेपासून, तर आळंदीपर्यंत आणि मुळा नदी वाकडपासून दापोडीपर्यंत प्रदूषित होत असल्याचे आढळून आले आहे. तर, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पिण्याचे पाणी आणि शहरातील नद्याचे पाण्याचे नमुने घेवून पाण्याची तपासणी केली जाणार आहे. त्यानूसार नद्याचे प्रदूषण आणि पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी मदत होणार आहे.